ऑनलाईन टीम/तरारून भारत
ईडीचे काही अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर बोलताना अशिष शेलार यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. संजय राऊत यांना याबाबत तक्रार करण्याचा अधिकार आहे. पण ते जे म्हणतील ते सगळेच योग्य आहे असे नाही. अनिल देशमुख प्रकरणात स्थानिक पोलिस सीबीआयला धमकी देतात. अशी घटना समोर आली आहे. याची लाज संजय राऊत यांना वाटायला हवी होती. अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
आशिष शेलार कोल्हापूर उत्तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आहेत. सोमवारी त्यांची जाहीर सभाही झाली. आज सकाळी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. तसेच भाजपचे सत्यजित कदम हे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला
पुढे बोलताना शेलार यांनी, मराठा आरक्षणावरूनही विरोधकांवर टीका केली. महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. कोल्हापूरकर याचा समाचार या निवडणुकीत घेतील असं ते म्हणाले. तसेच आमच्या खासदार संभाजी राजेंच्या डोळ्यातील अश्रू निखारेचे स्वरूप घेतील असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. खासदार संभाजीराचे हे मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. पण राजेंना महाविकास आघाडीमुळेच उपोषणाला बसावे लागले असा आरोप शेलार यांनी केला.
संभाजीराजे छत्रपती हे भारतीय जनता पक्षाच्या समन्वयाने आणि राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं. परंतु महाविकास आघाडीने त्यांना आझाद मैदानावर उपोषणला बसायला लावलं. मात्र उपोषणादरम्यान सत्ताधारी लोक त्यांच्याकडे चर्चेसाठी लवकर गेले नाहीत. तसेच राजेंच्या डोळ्यात अश्रू पाहूनही महाविकास आघाडीला दया आली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणावर महाविकास आघाडीची भूमिका काय? हा सवाल आमचा आहे. तसेच आरक्षणापुर्वी मराठा समाजातील मुलांना ज्या सुविधा फडणवीस सरकारने दिल्या, त्या सुविधा महाविकास आघाडी देणार का? असा सवालही शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
युवा आमदारांच्या भाषणाने हैराण झालो
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ काल आघाडीच्या युवा नेत्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या संस्कृतीवरून जोरदार टीका केली. यावर बोलताना आशिष शेलार यांनी ज्या तीन नेत्यांनी मुद्दे मांडले यावरुन आम्ही हैराण झालो आहे. ज्या नेत्यांनी गोध्रा, ईडीवर भाष्य केले त्यावर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असे शेलार म्हणाले. पण या नेत्यांनी अंतिम वर्षाच्या ऐनवेळी परीक्षा रद्द का केली?, विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडले आहेत त्यावर या नेत्यांची बोलती बंद होती, त्यामुळे त्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. तसेच विद्यापीठातही आता राजकारण सुरु झाले आहे. कोरोना काळात शाळेच्या वाढलेल्या फी, त्यावर ते शब्द का काढत नाहीत,. शाळा बंद शिक्षण चालू, म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या या घोषणेचा शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे, असा आरोप शेलार यांनी यावेळी केला.
दगडफेकीची घटना निंदनीय
रविवारी सायंकाळी भाजप चे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांची मुक्त सैनिक वसाहत येथे सभा झाली. यासभेवेळी काही व्यक्तींनी दगडफेक केली. यावर बोलताना शेलार म्हणाले, चित्रा वाघ यांच्या सभेवर झालेली दगडफेक ही संतापजनक घटना आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. तसेच महाविच्या नेत्यांनी दगडफेकीवरून आता चिखलफेक सुरू केली अशी टीकाही शेलार यांनी यावेळी केली.
मनसेच्या भूमिकेवर मी भाष्य करणार नाही
गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदानावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. राज ठाकरेंच्या या भाषणावर बोलताना शेलार म्हणाले, मी मनसेच्या भूमिकेवर भाष्य करणार नाही. पण भाजपच्या भूमिकेवर मी बोलू शकतो. तसेच या देशात सर्व धर्मियांना प्रार्थना करण्यास अडचण नाही. पण अनधिकृतपणे काही होत असेल तर त्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे, असे शेलार म्हणाले.
मुंबई पालिकेत स्वतःच्या जीवावर सत्ता आणणार
मुंबई पालिकेची निवडणूक होणार आहे. भाजप-मनसे युती होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. यावर बोलताना शेलार यांनी, भाजप आणि मनसे यांच्या युतीविषयी राजे ठाकरे यांच्याबरोबर कोणती चर्चा झालेली नाही. पण आम्ही स्वतःच्या जीवावर मुंबई महापालिकेत सरकार बसवू असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.