सलग दुसऱया दिवशीही कारवाई : अनेकांचे धाबे दणाणले
वार्ताहर /सांबरा
सांबरा येथे ग्राम पंचायतीच्यावतीने सलग दुसऱया दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
येथील मेन रोडवर तसेच शुक्रवारपेठ व मेन रोड ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले होते. काहींनी तर मेन रोडवर चक्क फुटपाथवर दुकाने थाटली आहेत. काहींनी गाळे उभारून अतिक्रमण केले होते. ग्राम पंचायतीने अतिक्रमण केलेल्यांना अनेक वेळा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर ग्राम पंचायतीने रविवार दि. 10 पासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. रविवारी शुक्रवार पेठ व मेन रोडवरील काही अतिक्रमणे हटविण्यात आली होती. सोमवारीही मेन रोड तसेच मेन रोड ते छत्रपती शिवाजी चौकपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. येथील सर्व अतिक्रमणे हटविण्यापर्यंत मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे.
याप्रसंगी ग्राम पंचायत अध्यक्षा रंजना अप्पयाचे, उपाध्यक्षा कल्लव्वा करेगार, सदस्य मारुती जोगाणी, भुजंग गिरमल, महेश कुलकर्णी, नितीन देसाई, सदस्या रचना गावडे, गंगू देसाई आदी उपस्थित होते.
सर्वच अतिक्रमणे हटवा
ग्राम पंचायतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मेन रोडवर व अन्य ठिकाणी खरोखरच अतिक्रमण करण्यात आले असेल तर कोणताही भेदभाव न करता अतिक्रमण हटवावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.