राहुल गांधी निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचे वक्तव्य: काँग्रेसमध्ये पुन्हा अस्वस्थता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या हायकमांडवर निर्णय घेता येत नसल्याचा हल्लाबोल केला आहे. “मी राहुल गांधींकडे अनेकदा समस्या मांडल्या, पण त्यांना त्या सोडवता आल्या नाहीत. काँग्रेस हायकमांडने मला असे पद दिले आहे की, जणू लग्न करून नसबंदी केली आहे’’ असे खळबळजनक वक्तव्य करत हार्दिक पटेल यांनी मनातील खदखद व्यक्त केली. हार्दिक पटेल यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्ष सोडण्याचीही चर्चा सुरू झाली असून त्यांना आम आदमी पक्षाने ऑफरही जाहीर केली आहे.
येत्या 6 महिन्यांत निवडणुका होणार आहेत, मात्र काँग्रेस हायकमांड कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. मी राहुल गांधींना वेळोवेळी राज्यातीच पक्षाच्या स्थितीची माहिती दिली. पण हायकमांडकडून कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. मी जवळपास तीन महिन्यांपासून पाटीदार नेते नरेश पटेल यांना काँग्रेसमध्ये येण्यास सांगत आहे, पण हायकमांड त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.
बिहार-ओडिशा प्रदेशाध्यक्षांचाही राजीनामा
पाच राज्यांमधील पराभवानंतर काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यकारिणींमध्ये फेरबदल करत आहे. या बदलांमुळे अनेक राज्यांत गदारोळ सुरू आहे. बिहार आणि ओडिशा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बुधवारी राजीनामा दिला. येथे नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे, तर हरियाणामध्येही नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे.
उत्तर प्रदेश, बंगाल, गोव्यातही विसंवाद
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि गोवा काँग्रेसमध्येही कलह कायम आहे. एक महिना उलटून गेला तरी उत्तर प्रदेशमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड झालेली नाही. याशिवाय गोव्यातील काही ज्येष्ठ नेते हायकमांडवर नाराज असल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर आता नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी हेदेखील लोकसभेतील काँग्रेसचे नेते आहेत. अशा स्थितीत बंगालमध्ये नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेससाठी तारेवरची कसरत ठरत आहे.
जी-23 नेत्यांनी उघडली होती आघाडी
पाच राज्यांतील पराभवानंतर जी-23 च्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये आघाडी उघडली होती. पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी राहुल गांधींच्या पक्षातील हस्तक्षेपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तथापि, सध्या हे नेतेही थंड झाल्याने आता काही प्रभावी युवा नेतेही आपली नाराजी उघडपणे व्यक्त करू लागल्यामुळे पक्षनेतृत्त्वाची डोकेदुखी वाढू शकते.