गर्डर ठेवून 15 दिवस उलटले तरी स्लॅबचे काम नाहीच : उड्डाणपूल वाहतुकीस खुला कधी होणार?
प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया रेल्वेफाटकावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलावर गर्डर ठेवून 15 दिवस उलटले तरी स्लॅबचे काम अद्याप झाले नाही. उड्डाणपुलाच्या उभारण्याच्या कामाची खासदारांकडून पाहणी झाल्यानंतर हे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे यावर्षात तरी उड्डाणपूल वाहतुकीस खुला होणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र एप्रिल संपत आला तरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही. रेल्वे मार्गादरम्यान गर्डर ठेवण्यात आल्यानंतर लागलीच स्लॅब घालून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात येईल व महिन्याभरात उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात येईल, असे कंत्राटदारांनी सांगितले होते. पण गर्डर ठेवून 15 दिवस झाले तरी अद्याप स्लॅबचे काम सुरू झाले नाही. सदर गर्डरवर पत्रे घालून त्यानंतर स्लॅबचे काम करण्यात येणार आहे. गर्डर ठेवल्यानंतर अधिकाऱयांसमवेत खासदारांनी पाहणी केल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामाची गती मंदावली आहे. त्यामुळे हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.
कामाची गती वाढविणे आवश्यक
रॅम्प निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पण हे कामदेखील थंडावले असून सर्व यंत्रणा थांबली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम कधी पूर्ण होणार? तसेच यावषी हा पूल खुला होणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. तिसऱया रेल्वेफाटकावर होणाऱया वाहतूक कोंडीच्या समस्येचे निवारण करण्यासाठी उड्डाणपूल वाहतुकीस खुला करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कामाची गती वाढविणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.