प्रतिनिधी/ बेळगाव
दुपारी वळिवाचे आगमन हे ठरलेलेच! असे आता बेळगावकरांना वाटू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून दुपारीच वळिवाचा पाऊस येत आहे. या पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून विद्युतपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर शनिवारीही पावसाचे आगमन झाले. दुपारी 3.30 च्या दरम्यान पावसाचे आगमन झाले. यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. विशेषकरून हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमांमध्ये पावसाचा व्यत्यय निर्माण झाला.
वळिवाचा पाऊस जणू सरासरी पावसाचा पल्ला गाठत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अधूनमधून वळिवाचे जोरदार आगमन होत आहे. काहीभागात जोरदार तर काहीभागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडत आहे. शनिवारीदेखील दुपारीच पावसाचे आगमन झाले. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली. दररोज पाऊस येत असल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.
गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा फटका साऱयांनाच सहन करावा लागत आहे. पूर्वी वळिवाचा पाऊस हा मेच्या अखेरच्या टप्प्यात होत असे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मार्चमध्येच वळिवाचा पाऊस कोसळत आहे. एप्रिलमध्येही हा पाऊस सुरू आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. काजू, आंबा, फणस यांचे मोठे नुकसान होत आहे. याचबरोबर कडधान्य पिकालाही फटका बसू लागला आहे. एकूणच बदलत्या ऋतुमानामुळे शेतकऱयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भक्तांसह आयोजकांनाही फटका
शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांनाही त्रास सहन करावा लागला. मोठय़ा उत्साहात हनुमान जन्मोत्सव सुरू होता. पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली होती. मात्र, दुपारी साडेतीनच्या दरम्यान पाऊस आल्याने भक्तांसह आयोजकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.