मुंबई उच्च न्यायालयाकडून विचारणा पाणी टंचाई समस्येवर मात करणे शक्य
प्रतिनिधी / पणजी
दरवर्षी उन्हाळय़ात गोव्यात पाणी टंचाई भासते. एरव्ही दिवसातून एक किंवा दोन तास नळाला पाणी सोडले जाते. पाणी टंचाईच्या काळात दोन दोन दिवस पाणी नसते. टँकरने पाणीपुरवठा होत नाही. खाणग्रस्त भागात तर नेहमी पाणी टंचाई असते. अशा परिस्थितीत बंद पडलेल्या खाणीमध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग करता येणार नाही का? अशी विचारण मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.
पिसुर्लेतील पाणी टंचाईचा प्रश्न मांडून हनुमत चंद्रकांत परब यांनी सादर केलेल्या जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी ऍड. अनामिका गोडे यांनी खाणीमधील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला.
सरकारला कळवूनही विचार होत नाही
खाणी बंद आहेत. त्यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी नसला तरी शेतीसाठी किंवा दुग्धउत्पादन करणाऱया आस्थापनासाठी, डेअरी फार्मिंगसाठी केला जाऊ शकतो. यावर विचार करण्यात यावा, असे अनेकवेळा सरकारला पत्रातून कळविण्यात आले. पण याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याची बाजू त्यांनी मांडली. याचिकादाराच्या वतीने वकिलांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर सरकारने दि. 4 मे 2022 पर्यंत उत्तर द्यावे, असा आदेश देऊन पुढील सुनावणी 4 मे रोजी ठेवण्यात आली आहे.