सांगली : प्रतिनिधी
बहिणीच्या लग्नासाठी मदुराईहून गावाकडे परतत असताना चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात भावाचा दुर्दैवी अंत झाला. अक्षय उत्तम शिंदे-पाटील ( २१, रा. लेंगरे, ता. खानापूर जि. सांगली) असे मयत युवक गलाई उद्योजकाचे नाव आहे. ही घटना कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग नजिक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हरियूर नजिक घडली. अपघातात अन्य दोनजण जखमी आहेत. एका उमद्या आणि मनमिळावू युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने लेंगरेसह खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील उत्तम शिंदे यांचा मदुराई येथे गलाई आणि सराफ व्यवसाय आहे. मुलगा अक्षय हा व्यवसाय सांभाळत होता. अक्षय हा अत्यंत मनमिळावू आणि हसतमुख होता. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने व्यवसायात लक्ष घातले होते. अत्यंत कमी वयात यशस्वी व्यवसायिक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. तर आपल्या मनमिळावू स्वभावाने त्याने गावी लेंगरे परिसरातही युवकांचे चांगले संघटन केले होते.
पुढच्या आठवड्यात उत्तम शिंदे यांच्या मुलीचा विवाह समारंभ नियोजित होता, त्यासाठी अक्षय बहिणीच्या लग्नासाठी म्हणून मदुराई येथून मंगळवारी ३ मे रोजी सायंकाळी चारचाकी वाहनाने (क्रमांक टीएन ५९ बीएच ५८१०) लेंगरेकडे निघाला होता. गावातीलच मदुराईस्थित गलाई उद्योजक धनाजी शिंदे-पाटील हे देखिल गावाकडे येण्यासाठी निघाले होते. त्याच गाडीतून अक्षय देखिल गावी येण्यासाठी निघाला होता. बुधवारी ४ मे रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग नजिक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हरियूर नजिक गाडी पुढे घेत असतानाच समोरील ट्रकवर (क्रमांक टीएन ५२ एल ८४९) अक्षय बसलेली चारचाकी गाडी जावून आदळली.
हा अपघात इतका भिषण होता की चारचाकी वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. पाठीमागून येणाऱ्या पोलिस आणि नागरीकांनी तातडीने जखमी अक्षय आणि धनाजी शिंदे, त्यांच्या पत्नी छाया यांना चित्रदुर्ग येथील दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी हलवत असतानाच अक्षय यांचा मृत्यू झाला. तर धनाजी शिंदे यांच्यावर गुरुवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
दरम्यान अपघाताची बातमी लेंगरे परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील लोकांनी तातडीने चित्रदुर्ग, बेंगलोर येथील काही गलाई व्यवसायिकांशी संपर्क साधला. तेथून तातडीने गलाई व्यवसायिक घटनास्थळी दाखल झाले. गावातूनही तातडीने गाडी रवाना झाली. अखेरीस रात्री सहा वाजण्याच्या सुमारास अक्षयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सकाळी मृतदेह गावात दाखल झाला. यावेळी युवकांची मोठी गर्दी झाली होती. पंचक्रोशीतून अबालवृद्धांनी गर्दी केली होती.