पुणे : आपण घरामध्ये अनेक विदेशी वस्तू दैनंदिन जीवनात वापरतो. घरातील व्यक्तींनी एकत्रित बसून अशा वस्तूंची यादी बनवली पाहिजे. यातून किती विदेशी वस्तू आपल्या घरात येतात, हे लक्षात येईल. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास नवउद्योजकांना उभारी मिळेल, त्यासाठी स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित ‘जितो कनेक्ट 2022’ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन झाले. त्यावेळी मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. जितोची थीम अमृत महोत्सवी कार्यक्रमाला धरून आहे. नुकतेच मी युरोपीय देशात भ्रमण करून आलो असून, अनेक लोकांशी विकासाबाबत चर्चा केली. जगभरातील भारतीय लोकांच्यात नवीन विश्वास, आशावाद दिसून येतो आहे. जागतिक शांतता दृष्टीने जग भारताकडे मोठय़ा आशेने पाहत आहे. वैश्विक कल्याणच्या दृष्टीने भारत पुढे जात असून, नवीन भारत हा सर्वांना जोडणारा आहे. देश बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान यात पुढे जात असून, दररोज अनेक स्टार्ट अप नोंदणीकृत होत आहे. देशातील कर व्यवस्था पारदर्शक, ऑनलाईन होत असून वन नेशन, वन टॅक्स याबाबतचे लक्ष्य पूर्ण केले जात आहे. उत्पादनांना प्रोत्सहित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून सरकारी व्यवस्थेत पारदर्शकता आणली जात आहे.
दुर्गम भागातील उत्पादक, बचत गट त्यांचे उत्पादन थेट सरकारला ऑनलाईन विक्री करू शकत आहे ही व्यवस्था निर्माण झाली आहे. सरकारी पोर्टलवर सुमारे 40 लाख उत्पादकांनी त्यांची नोंदणी केली असून त्यातील दहा लाख लोक मागील पाच महिन्यात जोडले गेले आहे. यातून नवीन व्यवस्थेवर लोकांचा विश्वास दिसून येतो. सरकारची इच्छा आणि जनतेचे पाठबळ असेल तर कोणताही बदल शक्य आहे ही बाब यातून स्पष्ट होत आहे.