महिला-पालकांमधून नाराजी ः सकस आहार पुरविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
महिला व बालकल्याण खात्यामार्फत गर्भवतींना दर महिन्याला धान्याचा पुरवठा केला जातो. याबरोबर अंगणवाडीतील बालकांनादेखील धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, हा निकृष्ट दर्जाचा असल्याने गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासन सकस आहार मिळावा, यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करते तर दुसरीकडे गर्भवती महिला आणि बालकांना किडलेल्या आणि सडलेल्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. संबंधित खात्याने लक्ष पुरवून सकस धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
गर्भवती महिला व बालकांना तांदूळ, गहू, तूरडाळ, शेंगदाणे, अंडी, रवा दरमहा पुरविला जातो. महिला आणि बालक आरोग्याच्यादृष्टीने सुदृढ रहावे आणि पौष्टिक आहार मिळावा, या दृष्टिकोनातून शासनामार्फत धान्य वितरित केले जाते. मात्र, महिला आणि बालकांना कमी दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात असल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. विशेषतः आरोग्य खात्याकडून गर्भवती महिलांना निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्याने गर्भवतींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या धान्यामुळे पौष्टिकता निर्माण होण्याऐवजी आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या प्रकाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
शासनाकडून पुरवठा केल्या जाणाऱया धान्याचे निरीक्षण आणि चौकशी आहार निरीक्षण अधिकाऱयांनी करावी, अशी मागणीही होत आहे. काही धान्य पाकिटांमधून वितरित केले जाते. त्यामध्ये अळय़ा आणि सडलेले धान्यदेखील आढळून येत आहे. शिवाय खराब अंडय़ांचेही वितरण केले जात आहे. शिवाय न शिजणाऱया डाळींचा पुरवठा केला जात असल्याने समस्या वाढल्या आहेत.
अंगणवाडीतून 0 ते 6 वर्षांखालील मुलांना पौष्टिक आहार म्हणून दूधपावडर, गूळ, शेंगदाणे पुरविले जातात. मात्र, हे धान्य सडलेले आणि किडलेले असते. त्यामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. बालकांना पौष्टिक आहार मिळणे आवश्यक असताना निकृष्ट दर्जाचा पुरवठा केला जात असल्याने महिलांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.