प्रेमप्रकरणाच्या वादातून खून झाल्याचा संशय
प्रतिनिधी / वास्को
मुरगाव तालुक्यातील वेलसांवच्या किनाऱयावर एका युवतीचा खून झाल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. मयत युवतीचे नाव दिया नाईक(18) असे असून ती नवेवाडे वास्कोतील राहणारी आहे. हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी नवेवाडेतीलच किशन कलगुटकर(26) या युवकाला पोलिसांनी घटना उघडकीस येण्याच्या चोविस तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले आहे.
या खून प्रकरणासंबंधी पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खूनाची ही घटना बुधवारी दुपारी तीन ते साडे तीनच्या सुमारास घडली असण्याची शक्यता आहे. मयत युवती बुधवारी संध्याकाळपासून गायब होती. तीच्याशी संपर्क होत नव्हता. वेर्णा पोलिसांना गुरूवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास वेळसांव किनाऱयावर अज्ञात युवतीचा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने किनाऱयाकडे कुच करून तीथे पाहणी केली असता सदर युवतीचा मृतदेह किनाऱयावरील झाडीत टाकण्यात आलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या युवतीच्या मानेवर व शरीरावर अन्य ठिकाणी सुऱयाचे वार झाल्याचेही दिसून आले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक निलेश राणे यांनीही पाहणी केली. मयत युवतीबाबत अधिक चौकशी केल्यानंतर तीची ओळख पटली. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी तीच्याशी मैत्री असलेल्या नवेवाडे वास्कोतीलच किशन कलगुटकर या युवकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने दिया नाईक हिच्या खुनाची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला खूनाच्या गुन्हय़ाखाली अटक करून पोलीस कोठडीत ठेवले.
प्रेमप्रकरणातील वादातून खून झाल्याचा संशय
खून प्रकरणी अटक करण्यात आलेला युवक किशन हा नवेवाडे भागातील गाझी स्टॉप म्हणून ओळखल्या जाणाऱया भागातील रहिवासी आहे. तर दिया नाईक ही नवेवाडेतील साईबाबा मंदिर परीसरातील राहणारी आहे. मयत दियाने यंदाची बारावीची परीक्षा दिलेली आहे. पोलिसांनी या खून प्रकरणातील आरोपीला चोवीस तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवलेले आहे. खुनाचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नसले तरी मयत युवती व सदर युवक यांच्यामध्ये मैत्री होती. मात्र, हल्ली त्यांच्यामध्ये बिनसले होते. प्रेम प्रकरण संपुष्टात येण्याच्या मार्गावर होते. या रागातूनच किशन याने तीला वेळसांवच्या निर्मनुष्य किनाऱयावर नेऊन तीथे तीला ठार केले व किनाऱयावरील झाडीत टाकून दिले असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वेर्णाचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासिएस हे पोलीस उपअधीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.
वेळसांव किनाऱयावर खुनाचे वाढते प्रकार, कडक गस्त ठेवण्याची स्थानिकांची मागणी
दरम्यान, वेळसांवच्या किनाऱयावर खून होण्याचे प्रकार हल्लीच्या काही वर्षात वाढलेले आहेत. या किनाऱयावरील काही भाग निर्मनुष्य असतो. या ठिकाणी प्रेमी युगुले तसेच दारू पिऊन दंगा मस्ती करणारे युवक व इतर समाज विघातक घटकांचा वावर संध्याकाळनंतर असतो. या प्रकाराचा किनाऱया नजीकच्या स्थानिक लोकांनाही त्रास होत असतो. मागच्या तीन वर्षांत या किनाऱयावर तीन खून प्रकरणे घडलेली आहेत. पोलिसांनी या किनाऱयावर विशेषता वाईट गोष्टी घडत असलेल्या भागावर कडक गस्त ठेवावी. इथे गैरप्रकार करणाऱयांवर कडक कारवाई करावी. तरच या किनाऱयावरील गुन्हेगारीचे प्रकार बंद होतील असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.