तक्रारदार रोहन होबळे यांचा आरोप : खारफुटी कत्तलीचे सादर केले पुरावे
प्रतिनिधी /पणजी
मेरशी पंचायत क्षेत्रातील मोरंबी ओ ग्रांद टेनन्ट संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केलेल्या खारफुटी कत्तल प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी एफआयआर नोंदविलेला असतानाही मामलेदार दशरथ गावस हे त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून पाठराखण करत आहेत, त्यामुळे अशी गैरकृत्ये करणाऱयांना चेव चढला असून त्यातूनच ते आपले आरोप खोटे ठरविण्याचे प्रयत्न होत आहेत, असा आरोप तक्रारदार रोहन होबळे यांनी केला आहे.
रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या हे प्रकरण विकोपाला पोहोचले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. या खारफुटी कत्तल प्रकरणी संघटनेचे अध्यक्ष समीर कुतिन्हो, पदाधिकारी विश्वनाथ नाईक व मेंडिस यांच्या विरोधात होबळे यांनी पोलीस तक्रार दाखल केली होती. त्याशिवाय अन्य सर्व संबंधित खात्यांकडेही लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मात्र सदर तक्रार निराधार असल्याचा दावा कुतिन्हो यांनी केला होता.
त्या विरोधात होबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले आरोप पुराव्यांसह सिद्ध करण्याचे प्रयत्न केले. तसेच संघटनेच्या पदाधिकाऱयांकडून त्यांना झालेल्या अर्वाच्च शिवीगाळीचे व्हीडीओ चित्रीकरणही सादर केले. खारफुटी झाडे कापण्यास बंदी असताना संघटनेने सुमारे 150 झाडे कापली आहेत. तरीही वनखात्याने 30 झाडेच कापल्याचे अहवालात म्हटले आहे. या संख्येत तफावत असली तरीही झाडे कापल्याचे सिद्ध तरी झाले आहे. अशाप्रकारे संघटनेच्या नावाखाली येथील जमीन बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न असून ही जमीन बेकायदेशीर क्रॅप अड्डय़ांना देण्याचा त्यांचा डाव आहे, असा दावा होबळे यांनी केला.
संघटनेचा दावा म्हणजे ’चोराच्या उलटय़ा बोंबा’ या प्रकारात मोडणारा आहे. त्यांच्या विरोधात आमच्याकडे सर्व पुरावे असतानाही कोणत्या आधारावर ते आम्हाला खोटे ठरविण्याचे प्रयत्न करतात असा सवाल होबळे यांनी उपस्थित केला. सदर खारफुटी कापण्यासाठी जेसीबी यंत्राचा वापर करण्यात आला आहे, याची छायाचित्रे होबळे यांनी सादर केली. मानसीच्या बांधावर कित्येक टन वजनी यंत्र कसे व कोणाच्या मान्यतेने नेण्यात आले, असा सवाल होबळे यांनी उपस्थित केला.
मानसीच्या दुरुस्तीसाठी तिच्या मुळातीलच चिखल उपसून बांधावर टाकायचा असतो. परंतु येथे उलट चित्र दिसत असून लोकांच्या शेतातील चिखल बांधावर टाकण्यात आला आहे. तसेच तेथील चिखल टाकून लोकांची वाट अडविली आहे, असा दावा होबळे यांनी केला.
अशाप्रकारे यंत्राद्वारे चिखल उपसण्याच्या प्रयत्नात मानसीची नुकसानी तर केलीच आहे, त्याशिवाय तेथील ओएफसी केबलचेही मोठे नुकसान केले आहे. तरीही कुणीही कारवाई केली नसल्याचे होबळे म्हणाले. याच परिसरात कोमुनिदाद आणि खाजगी जमीन आहे. संघटनेकडून बांध दुरुस्तीच्या नावाखाली त्यांचीही वाट चिखल टाकून अडविण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे याच मामलेदारांनी यापूर्वी सदर मानस सुस्थितीत नसल्याचा दावा करून संघटनेला नोटीस बजावली होती. त्यांची जाळीही जप्त केली होती. आता तोच मामलेदार त्यांच्या तारणहार बनून त्यांना पूर्ण सहकार्य आणि पाठबळ देत आहे. ज्याने चोरांना रंगेहाथ पकडले त्याच अधिकाऱयाने त्या चोरांना निर्दोश मुक्त करावे, असा हा प्रकार आहे, असे होबळे म्हणाले.
यावेळी आपणाजवळ असलेली सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर करताना होबळे यांनी संघटनेकडे कोणतेही पुरावे असल्यास जाहीर करावे, असे आव्हान दिले.