तरुण भारत : ऑनलाईन
भारतात बऱ्याच दिवसापासून 5G तंत्रज्ञानाच्या विषयीच्या चर्चा सुरु आहे. आता भारतीयांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. ही सेवा भारतीयांच्या सेवेत येणार असून दळणवळण आणि दूरसंचारच्या बाबतीत आता भारत आता इतर देशांच्या बरोबरीने जाईल, अशी आशा आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री, अश्विनी वैष्णव ( Ashwin Vaishnav ) यांनी सांगितले आहे की, 5G नेटवर्क विकासाच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे देश आता 6G मानकांच्या विकासात सामील झाला आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वीच 31 डिसेंबर 2021 पर्यंत 5G प्रकल्प पूर्ण होईल असे घोषित केले होते. दूरसंचार मंत्र्यांनी अशीही घोषणा केली होती की, सरकार यावर्षीच्या जूनच्या सुरुवातीला 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करेल आणि या लिलावानंतर, लगेच सरकार या वर्षीच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 13 शहरांमधील लोकांना 5G सेवा प्रदान करू शकेल.
17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi ) हस्ते भारतातील पहिल्या 5G टेस्टबेडचे उद्घाटन झाल्यावर लगेच, 22 मे रोजी केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआयटी-मद्रासमध्ये 5G कॉलिंगची यशस्वी चाचणी केली.
5G तंत्रज्ञान नेमकं आहे काय ?
मोबाइल ब्रॉडबँड नेटवर्कचा झालेला दीर्घकालीन विकास म्हणजे 5G तंत्रज्ञान होय. 2G, 3G, 4G नंतरची सर्वात अलीकडची अपग्रेडेड अशी पाचवी पिढी म्हणजेच 5th Generation आहे. त्यालाच 5G म्हणून ओळखले जाते. 5G तंत्रज्ञान हे प्रामुख्याने तीन प्रकारच्या बँडमध्ये कार्यरत आहे. यामध्ये कमी, मध्यम आणि उच्च फ्रिक्वेंसीचे स्पेक्ट्रम असे प्रकार असून प्रत्येकाचे स्वतःचे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत.
5G वायरलेस ब्रॉडबँड कनेक्शनद्वारे प्रसारित केलेला डेटा मल्टीगिगाबिट वेगाने प्रवास करतो. त्याचा वेग 20 गिगाबाईट प्रति सेकंद (Gbps) पर्यंत वाढू शकतो. 5G ही गती वायरलाइन नेटवर्क गतीपेक्षा जास्त आहे. हा स्पीड 5 मिलीसेकंद (ms) किंवा त्याहून कमी वेळात असा आहे. या प्रकारचा स्पीड रीअल-टाइम फीडबॅकची अनुभुती देतो. 5G तंत्रज्ञानातील बँडविड्थ आणि प्रगत अँटेना तंत्रज्ञानामुळे डेटाची मोठ्या प्रमाणात तसेच अधीक वेगवान आदानप्रदान करू शकतो.
यामध्ये लो-बँड स्पेक्ट्रमने इंटरनेट, डेटा एक्स्चेंज कव्हरेज आणि गतीच्या बाबतीत आपली क्षमता लक्षणीयरित्या सिध्द केली असून याचा कमाल वेग फक्त100 एमबीपीएस आहे. म्हणजेच, ज्यांना हाय-स्पीड इंटरनेटची गरज नाही अशा मोबाइल वापरकर्त्यांसाठी टेलकॉम कंपन्या असे नेटवर्क स्थापित करू शकतात.
भारतात 5G नेटवर्क आणि त्यासंबंधीत सेवा पुढील काही वर्षांमध्ये मोबाइल आणि इंटरनेट-सक्षम उपकरणांच्या वाढत्या मागणीला सामावून घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने आणल्या जातील. एकंदरीत, 5G मधून विविध प्रकारची नवीन ऍप्लिकेशन्स, उपयोग आणि व्यवसायिक गोष्टी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
कसे कार्य करते 5G ?
5G चे वायरलेस नेटवर्क सेल साइट्सचे बनलेले असून जे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागलेले असतात. हे नेटवर्क रेडिओ लहरींद्वारे डेटा पाठवतात. वायरलेस नेटवर्कची चौथी पिढी (4G) लाँग-टर्म इव्होल्यूशन (LTE) ही वायरलेस तंत्रज्ञान 5G चा पाया मानला जातो. यातील फरक एव्हढाच की 4G नेटवर्कला लांब अंतरावर सिग्नल प्रसारित करण्यासाठी मोठ्या, उच्च-पॉवर सेल टॉवर्सची आवश्यकता असते, तर 5G वायरलेस सिग्नल्स मोठ्या संख्येने लहान सेल स्टेशन्सद्वारे प्रसारित केले जातात.
वायरलेस तंत्रज्ञानाच्या मागील पिढ्यांनी स्पेक्ट्रमच्या लो-फ्रिक्वेंसी बँडचा वापर केला आहे. mmWave मधील अंतर आणि हस्तक्षेपाशी संबंधित अनेक आव्हाने येऊ शकतात. ती पूर्ण करण्यासाठी, वायरलेस टेलिकॉम उद्योग 5G नेटवर्कसाठी लो-फ्रिक्वेंसी स्पेक्ट्रम वापरु शकतात. ह्या सोईमुळे नेटवर्क ऑपरेटर कंपन्या त्यांचे नवीन नेटवर्क तयार करण्यासाठी त्यांच्याकडे आधीपासून असलेले स्पेक्ट्रम वापरू शकतील. लोअर-फ्रिक्वेंसी स्पेक्ट्रम जास्त अंतरापर्यंत पोहोचू शकतो परंतु mmWave पेक्षा वेग आणि क्षमता याबाबतीत त्यावर मर्यादा आहेत.
भारतात 5G सेवा कधी सुरू होईल?
भारतात 5G सेवा देण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपन्या उत्सुक असून यामध्ये Jio, Vodafone आणि Airtel या कंपन्या प्रमुख दावेदारांच्या शर्यतीमध्ये सामिल आहेत. पण कोणता दूरसंचार ऑपरेटर किंवा टेलिकॉम कंपनी 5G सेवा प्रथम सुरू करेल हे दूरसंचार मंत्रालयाने उघड केलेले नाही. तथापि, तिन्ही दूरसंचार ऑपरेटर त्यांच्या 5G सेवा एकाच वेळी सुरू करतील अशी शक्यता आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनने 5G सेवा मिळण्याची शक्यता असलेल्या 13 शहरांमध्ये त्यांची स्वत:ची चाचणी साइट्स आधीच उभा केली आहे. याहीपुढे Airtel आणि Jio या दोघांनीही आपण भारतात 5G सेवा आणणारे पहिले ऑपरेटर असल्याचा दावा केला आहे.