प्रयाग चिखली/प्रतिनिधी
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गवर केर्ली गावाजवळ महिंद्रा पिकअप गाडीने ओव्हरटेक करताना मोटरसायकलस्वारास उडवल्याने झालेल्या अपघातात पोर्ले (ता.पन्हाळा) येथील शंकर तुकाराम पाटील हे निवृत्त पोलीस निरीक्षक जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला.
याबाबतची अधिक माहिती अशी, पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील शंकर तुकाराम पाटील हे पोलीस खात्यातून तीन वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. परिसरात शंकर तुकाराम तथा एस. टी. नावाने ते परिचित होते. निवृत्तीनंतर सध्या ते तीन वर्षे ते कायद्याचे शिक्षण घेत होते. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शंकर पाटील कोल्हापूरहून त्यांच्या मोपेड गाडीवरून पोर्ले गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीने त्यांना जोरदार धडक दिली यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तबंबाळ स्थितीत ते खाली कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते जागीच ठार झाले. तर ऍक्टिवा गाडीचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला आणि मयत शंकर पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटल येथे नेण्यात आला.
पोर्ले येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले शंकर पाटील हे लहानपणापासूनच हुशार आणि चिकित्सक होते. स्थानिक पातळीवरील शिक्षण झाल्यानंतर त्यांनी १९८० साली कोल्हापुरातील शहाजी कॉलेज येथे बारावीपर्यंत तर त्यानंतर चे शिक्षण विवेकानंद कॉलेज येथे घेतले. विद्यार्थीदशेत अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत कबड्डी आणि कुस्ती खेळांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवल्याचे त्यांचे विद्यार्थी मित्र व गोकुळचे संचालक एस. आर. पाटील यांनी सांगितल. १९८५ साली ते पोलीस भरती झाले. त्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आदी ठिकाणी त्यांनी पोलीस सेवा बजावली. अखेरच्या काळात पोलीस निरीक्षक पदावरून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर सध्या गेली तीन वर्षे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या घरी त्यांचा मुलगा अभिजीत यांचा विवाह झाला होता.
आयुष्याच्या उत्तरार्धात कायद्याचे शिक्षण घेऊन समाजसेवा करण्याचा त्यांचा मनोदय होता. गेली अनेक वर्षे पायी वारी सोहळ्यामध्ये ते सहभागी होत होते. चालू वर्षी आषाढी वारीसाठी त्यांची तयारी चालू होती. येथील महादेव भजनी मंडळाचे ते सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे पोर्ले परिसरातील अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे गोकुळचे संचालक एस आर पाटील यांनी म्हटले आहे.