भारत बागकार यांनी मांडला ठराव.
वार्ताहर /धारगळ
विधवा महिलांची या पुढे धारगळ ग्राम पंचायत क्षेत्रात हेळसांड होणार नाही. त्यांना समाजात आदर पूर्वक वागवले जाईल. पतीच्या निधना वेळी त्यांचे कुंकू पुसले जाणार नाही, त्यांचे मंगळसूत्र काढले जाणार नाही, हातातील बांगडय़ा फोडल्या जाणार नाहीत, पायातील वेडे काढले जाणार नाही व त्यांना कधीच अशुभ मानले जाणार नाही. शुभ कार्यालासुद्धा त्यांना इतर स्त्रिया प्रमाणेच आग्रहाचे आमंत्रण असेल असे ठरवण्यात आले.
प्रा. भारत बागकर यांनी मांडलेल्या ऐतहासिक निर्णयाचा ठराव पेडणे तालुक्मयातील धारगळ ग्राम पंचायत ग्रामसभेवेळी सर्वानुमते समंत करण्यात आला. ठरावाला शाम धारगळकर यांनी अनुमोदन दिले. रविवार दि. 29 मे रोजी ग्राम पंचायत सभागृहात झालेली ही ग्राम सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.
व्यासपीठावर सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच प्रदीप उर्फ भूषण नाईक उपस्थित होते तर उप सरपंच अनुराधा नाईक इतर पंच सदस्य वल्लभ वराडकर, सुनीता राऊळ, सोनाली साळगावकर, प्रदीप पटेकर, अर्जुन कानूळकर दाजी शिरोडकर, सुभाष धारगळकर उपस्थित होते.
सुरवातीला सरपंचानी सर्वांचे स्वागत केले, पंचायत सचिव फ्रान्सिस फर्नांडिस यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला तसेच ठरावांचे वाचन केले. त्यानंतर 22 -23 सालचे अंदाज पत्रक सादर करून समंत करण्यात आले. 21 -22 सालाच्या सुधारित अंदाज पत्रकाला मंजुरी दिली, तसेच प्रशासकीय अहवालाचे वाचन केले, तसेच जमा खर्चाचा तपशील सादर करून त्याला मान्यता दिली. जैव व्यवस्थापन समितीचा कार्यक्रम व अहवाल सादर करून त्याला मान्यता दिली.
या वेळी मोपा विमानतळ व मोपा लिंक रोडसाठी धारगळ ग्रामपंचायतीने दिलेला ना हरकत दाखला मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. विमानतळ बांधणारी कंपनी व सरकार आपल्या शब्दाशी फारकत घेऊन स्थानिकांना फसवत आहे. जमीन गेलेले शेतकरी, त्यांना जमीन गेलेल्याचे प्रमाणपत्र दिलेले नाही, स्थानिक बेरोजगाराना नोकरी न देता बाहेरील लोकांना देण्यात येत आहेत, शेतकऱयांच्या जमिनी बळजबरीने घेऊन त्यांना वेठीस धरले जाते, कायद्याच्या कचकटीमुळे जमिनीचा मोबदला मिळत नाही. व्यवसायच्या संधी राज्याबाहेरील लोकांना दिल्या जात आहेत या गोष्टीमुळे आम्हाला विमानतळच नकोच आशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी सरपंच व सचिव यांनी शेतकऱयांकडून विमानतळबद्दल ज्या तक्रारी असतील त्या लिहून देण्यास सांगितले.
धारगळ येथे होत असलेल्या आयुष हॉस्पिटलमध्ये यापूर्वी किती स्थानिकाना रोजगार मिळाला आहे व या पुढे स्थानिकांनाच रोजगार मिळावा म्हणून पंचायतीने काय योजना आखल्या आहेत ती माहिती द्यावी असे ग्रामस्थांनी सुचवले. या विषयी बोलताना सरपंचानी सांगितले की आयुष हॉस्पिटलने आपले कार्य सुरु करण्यासाठी हॉस्पिटलला परवानगी मागितली आहे, ती देण्यात येईलच, पण त्यांच्या बरोबर करार करून काही मागण्या ठेवण्यात येतील व स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात यावे असे सांगण्यात येईल.
विधवाना सन्मान देण्याविषयी बोलताना सरपंच भूषण नाईक यांनी हा एक संवेदनशील विषय असून अशा विषयावर कोण भाष्य करायला पुढे येत नाही असे सांगितले. तरी प्रा. भारत बागकार यांनी हा विषय मांडला त्याला आपण सरपंच म्हणून व एक नागरिक म्हणून सतत सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हा ठराव मांडला म्हणून त्यांनी प्रा भारत बागकर यांचे अभिनंदन केले.
विधवा ना सन्मान देण्याचा ठराव मांडणारे सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक विषयावर कार्यरत असलेले प्रा. भारत बागकर म्हणाले की शेकडो वर्षांपासून काही रूढी परंपरा आमच्या समाजात चालत आहेत. ज्या परंपरांचा समाजाला काहीच फायदा नाही, उलट समाज्याच्या एखाद्या घटकला त्याचे नुकसान होतं असेल तर ती परंपरा रद्द करणे समाज हिताचे ठरते. एखाद्या स्त्रीचा नवरा मरतो तेव्हा तिच्यावर दूखाचा डोंगर कोसळतो ती ओक्साबोक्सी रडते आणि त्यातच परंपरेनुसार तिचा कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगडय़ा फोडणे इत्यादी मुळे ती आणखीनच खचून जाते. अशा प्रकारच्या सर्व चाली रितीना मूठमाती देणे क्रम प्राप्त आहे असे ते म्हणाले.
सभेमध्ये पुंडलिक धारगळकर, अवेलीने रॉड्रिगीस, शाम धारगळकर इत्यादींनी आपले विचार मांडले बीडीओ च्या प्रतिनिधी म्हणून दीपाली काजोळी यांनी काम पाहिले. लक्ष्मी राव विनायक बांदोडकर, इत्यादींनी सहकार्य केले.