300 युवक-युवतींची संघटनेत करविली भरती ः एनआयएकडे चौकशीची जबाबदारी
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाममधील प्रतिबंधित उग्रवादी संघटना उल्फा-आय (युनायटेड लिबरेशन प्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडेंट) पुन्हा डोकं वर काढण्याच्या प्रयत्नात आहे. यासंबंधी गृह मंत्रालयाचा अहवाल समोर आला आहे. उल्फा-आय संघटना आसामसोबत दिल्ली-एनसीआरपर्यंतच्या तरुण-तरुणींची भरती करत उग्रवादी प्रशिक्षण देण्याच्या हालचाली करत आहे. मागील महिन्यात सुमारे 150 तरुण-तरुणींची भरती करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
उल्फा-आय उग्रवादी संघटना अपहरणासह जवान तसेच सर्वसामान्य नागरिकांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. या अहवालानंतर गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला तपास सोपविला आहे. मोठय़ा संख्येत तरुण-तरुणी उल्फा-आयमध्ये सामील झाल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱयांनी मान्य केले आहे. चहाच्या मळय़ांच्या भागांतील 300 हून अधिक तरुण-तरुणी उल्फा-आयमध्ये सामील झाल्याहेत. गावांपासून गुवाहाटीपर्यंतचे काही तरुण बेपत्ता झाल्याचे आणि काही काळानंतर ते उल्फामध्ये सामील झाल्याचे सांगण्यात येत आहे.
म्यानमारच्या सीमेत उल्फाचा तळ
आसाममध्ये पोलिसांच्या कठोर सतर्कतेमुळे उग्रवादी संघटना म्यानमार सीमेत नवा प्रशिक्षण तळ चालवत आहे. तेथून ये-जा करण्यासाठी नागा भागांमधून जावे लागते, तेथील काही गावांमध्ये त्यांना वास्तव्यासाठी मदत मिळत आहे. तर म्यानमार सीमेत ही उग्रवादी संघटना एनएससीएन (आयएम)वर अन्नधान्यासाठी अवलंबून आहे. याकरता वार्षिक रक्कम नागा उग्रवादी संघटनेला द्यावी लागते.
सोशल मीडियाचा वापर
सरकारसोबत संघर्ष विराम करार आणि शांतता चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करण्यासह 4 दशके जुन्या उल्पाने स्वतःचा फेसबुक ग्रूपही तयार केला आहे. याच्या मदतीने उग्रवादी संघटना तरुण-तरुणींना स्वतःच्या कारवायांमध्ये सामील करू पाहत आहे. दुर्गम भागांमध्ये पोहोचून उग्रवादी संघटना स्वतःचे संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पेंगीरी, काकोपथार यासारख्या भागातील दुर्गम गावे विकासापासून वंचित आहेत. दारिद्रय़ामुळे तेथील तरुण-तरुणींना स्वतःच्या जाळय़ात ओढणे उल्फासाठी सोपे ठरू शकते. मे महिन्यात उल्फा-आय प्रमुख परेश बरुआने हेरगिरीच्या आरोपाखाली दोन सदस्यांना मृत्युदंड सुनावला होता.
चहा मळय़ांमध्ये 40 लाख मजूर
इंग्रजांच्या काळापासून आसामच्या चहाच्या मळय़ांवर लाखो मजुरांसह मोठय़ा संख्यते अन्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. तरीही स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यांच्या या स्थितीचा लाभ अलिकडच्या वर्षांमध्ये आसाम आणि ईशान्येतील राज्यांमध्ये सक्रीय उग्रवादी संघटनांनी उचलला आहे. याचमुळे विशेष पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) जी.पी. सिंह यांनी अधिकाऱयांना उल्फापासून सतर्क राहण्याची सूचना केली आहे.