गोवा सरकारने विधानसभेत ठराव घ्यावा : हिंदू राष्ट्र अधिवेशनात मागणी
प्रतिनिधी/फोंडा
देशभरात हिंदूंच्या मोठय़ाप्रमाणात चालेल्या अवैद धर्मांतराला आळा घालण्यासाठी भारतीय राज्य घटनेतील कलम 25 मध्ये सुधारणा करुन त्यातील धर्मप्रचार म्हणजेच ‘प्रोपगेट रिलिजन’ हा शब्द वगळणे आवश्यक आहे. त्यासाठी गोवा सरकारने विधानसभेत ठराव पारीत करुन केंद्र सरकारला पाठविण्याची मागणी रामनाथी येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात करण्यात आली.
स्वतःच्या धर्माचे पालन करण्यास कुणालाही बंदी नसावी, मात्र इतर धर्मीयांना फसवून जबरदस्तीने किंवा त्यांच्या असाहायतेचा फायदा घेऊन केलेले धर्मांतर हा गुन्हा आहे. त्यासाठी अवैध मार्गाने होणाऱया धर्मांतरावर निर्बंध येणे गरजेचे आहे, असे मत सीबीआयचे माजी हंगामी संचालक एन. नागेश्वर राव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे, तेलंगणा येथील श्रीमती एस्थर धनराज, छत्तीसगड येथील भाजपाचे प्रदेश मंत्री प्रबल प्रतापसिंह जुदेव व नेपाळ येथील विश्व हिंदू महासंघाचे शंकर खरेल हे उपस्थित होते. हिंदूंचे धर्मांतर करुन भारताला तोडण्याचे षडयंत्र चालू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
गोव्यात धर्मांतर बंधी कायदा आणा ः डॉ. चारुदत्त पिंगळे
डॉ. पिंगळे म्हणाले, धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूमध्ये धर्मजागृती करुन धर्मशिक्षण दिले पाहिजे. विविध राज्यामध्ये धर्मांतर बंदी कायदे असले तरी त्याचे सर्रासपणे उल्लेघन होताना दिसते. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणास प्रारंभ केल्यास कुणीही धर्मांतर करणार नाही. गोव्यातही धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी त्यांनी केली. गोव्यात डॉमनिक व अन्य ख्रिस्ती प्रचारकांकडून जे धर्मांतर चालू आहे त्याला प्रतिबंध घालण्यासाठी गोव्यात हा कायदा अनिवार्य असल्याचे ते त्यांनी सांगितले. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी छत्तीसगडमध्ये हिंदूंचे धर्मांतर करणाऱया विदेशी शक्तीकडे प्रचंड पैसा आणि साधने असल्याचे सांगितले. आपल्या वडिलांनी लाखो हिंदूंची तर आपण स्वतः पंधरा हजार हिंदूंची घरवापसी केल्याचे ते म्हणाले. हे कार्य करताना आमच्यावर जीवघेणे हल्ले झाले. धर्मांतर रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये धर्म समिती स्थापन करुन धर्मसेना उभी केली पाहिजे. शंकर खरेल यांनी नेपाळमध्ये तीन कोटी लोकसंख्येच्या देशात आजवर 30 लाख लोकांचे धर्मांतर झाल्याचे सांगितले. नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्यावेळी मदतकार्याच्या आड काही मिशनऱयांनी धर्मांतराचे कृत्य केल्याचेही त्यांनी नमूद केले. हे अवैध धर्मांतर रोखण्यासाठी गरीबी, शिक्षण व अन्य मूलभूत गोष्टीवर काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. एस्थर धनराज म्हणाल्या, आपण स्वतः ख्रिश्चन होते. मात्र अमेरिकेत गेल्यावर बायबलचा अभ्यास केला व त्यात तर्कशास्त्र नसल्याचे आढळले. पुढे भारतात आल्यावर मिशनरी लोकाकडून धर्मांतरासाठी चाललेले षड्यंत्र पाहून त्या विरोधात जागृती सुरु केली. धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे आणि युवकांचे समुपदेशन करण्याचे काम आपण करीत असल्याचे त्या सांगितले.