तरुणभारत ऑनलाइन
पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात जास्तीत जास्त रानभाज्या खाल्ल्या जातात.कुर्डू,पाथरी, मोरशेंडा, नाल,शेंडवेल यांसारख्या अनेक भाज्या शेतात पाहायला मिळतात.या भाज्यांची नावे वेगळी असली तरी त्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.यापैकीच कंटोळी ही भाजी कारल्याच्या प्रजातीतील आहे.पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी बाजारात देखील सहज उपलब्ध होते.कंटोळी शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे. त्याचबरोबर ही भाजी अनेकदा औषधी स्वरूपातही वापरली जाते. जाणून घेऊयात या भाजीचे आणखी काय फायदे आहेत.
आयुर्वेदात कंटोळी सर्वात ताकदवान भाजी मानली जाते. कारल्याप्रमाणे दिसणारी ही भाजी कडवट नसून चवीला उत्तम आहे. म्हणूनच काही भागात या भाजीला गोड कारले म्हणून ओळखले जाते. तर काही ठिकाणी करटोली,काकोरी असं म्हंटल जाते.कंटोळीचे काही दिवस सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते.कंटोळीमध्ये मांसाहारापेक्षाही अधिक प्रोटीन असतात. यामध्ये असणारे फायटोकेमिकल्स शरीर निरोगी बनवतात. तसेच यातील अँटीऑक्सिडंट रक्त शुद्ध करतात त्यामुळे त्वचासंबंधी रोगही कमी होतात.
कंटोळीची भाजी खायची नसल्यास त्याचं लोणचंही तयार करता येतं. पचनक्रिया सुधारण्यासाठी कंटोळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी देखील कंटोळी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर नेत्ररोग, हृदयरोग तसेच कर्करोगाच्या रूग्णांसाठीही या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते.मधुमेहींसाठीदेखील ही रानभाजी फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.