जेतेपदाला 39 वर्षे पूर्ण ः सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मणसह दिग्गजांचा कपिल अँड कंपनीवर कौतुकाचा वर्षाव
मुंबई / वृत्तसंस्था
1983 मध्ये लिजेंडरी अष्टपैलू कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिलावहिला आयसीसी विश्वचषक जिंकला, त्याला शनिवारी 39 वर्षे पूर्ण झाली. भारतीय क्रिकेटमध्ये नवे पर्व सुरु करणाऱया या जेतेपदानिमित्त सेहवाग, लक्ष्मणसह अनेक दिग्गजांनी तत्कालीन विश्वचषक जेत्या संघाचे पुनश्च अभिनंदन केले.
1975 व 1979 मध्ये अगदी साखळी फेरीही पार करता न आलेल्या भारताने 1983 मध्ये मात्र, झिम्बाब्वे, विंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्यासारख्या दिग्गज संघांना धूळ चारत जेतेपदावर आपली मोहोर उमटवणे लक्षवेधी ठरले होते. विंडीजचा संघ त्यावेळी जेतेपदासाठी अर्थातच फेवरीट होता. मात्र, प्रतिकूल स्थितीतही विजय खेचून आणण्याची जिगर कपिल व त्याच्या सहकाऱयांनी प्रत्यक्षात साकारुन दाखवली होती.
1983 मध्ये भारताचे स्वप्न साकारले गेले. त्या जेतेपदाचा सर्व भारतीयांना अभिमान राहिला आहे. त्या विजयामुळेच अनेक खेळाडूंनी भारतीय संघातून खेळण्याचे स्वप्न पाहिले, असे व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला. भारताने याच दिवशी 1932 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण व 1983 मध्ये विश्वचषक जेतेपद मिळवले असल्याने हा दिवस खास आहे, असे सेहवाग म्हणाला.