शॅडो कौन्सिलच्या सावियो कुतिन्हो यांची टीका, त्वरित काम हाती घेण्याची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
कोंब, मडगाव येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवर जनतेला आणि विशेषतः विद्यार्थी वर्गाला होणारे त्रास दूर होत असल्याचे दिसत नाही. येथे अनेक दुर्घटना घडल्या आहेत, तरीही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत राहिलेल्यांकडून कोणत्याही कायमस्वरूपी उपायाचा विचार झालेला नाही, अशी टीका शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केली आहे.
2012 मध्ये जेव्हा मी मडगावमधून निवडणूक लढवली होती तेव्हा कोंब रेल्वे लेव्हल क्रॉसिंग येथे उड्डाणपूल उभारण्याचे आश्वासन माझ्या जाहीरनाम्यात समाविष्ट होते. मी या निवडणुकीत यशस्वी झालो नाही, तरीही मी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि 6 ऑगस्ट, 2012 रोजी दिल्ली येथे तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांना 3 मागण्यांचे निवेदन दिले. कोंब येथे उड्डाणपूल, मडगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील तिकीट काउंटर आणि आझादनगरी झोपडपट्टय़ांचे कायमस्वरूपी पुनर्वसन यांचा त्यात उल्लेख होता. रेल्वे क्रॉसिंगवरील परिस्थिती रॉय यांनी व्यक्तिशः पाहिली होती. त्यांनी मडगावमध्ये माझ्यासाठी प्रचार केला होता आणि जाहीर सभेत उड्डाणपूल उभारण्याचे आश्वासन दिले होते, याची कुतिन्हो यांनी आठवण करून दिली.
दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाने संबंधित अधिकाऱयांकडे आवश्यक पत्रव्यवहारही केला होता. यामध्ये राज्य सरकारकडून अधिकृत प्रस्ताव मागवण्यात आला होता. स्थानिक आमदार किंवा राज्य सरकारने केवळ औपचारिक प्रस्ताव मांडला असता, तर मडगावकरांचे हे दीर्घकाळापासून राहून गेलेले स्वप्न आणि इच्छा आतापर्यंत पूर्ण झाली असती, अशी खंत कुतिन्हो यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेला रावणफोंड येथील पूल तांत्रिक कारणास्तव उड्डाण घेऊ शकलेला नसून 2027 पर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता नाही. असे असताना कोंब येथील उड्डाणपुलासाठी कोणताही प्रस्ताव येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
दुर्दैवाने या व्यावसायिक राजधानीची अवस्था वाईट होत चालली आहे. 2000 च्या सुरुवातीस धूमधडाक्यात प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन कमिटी नावाची एक समिती स्थापन करण्यात आली. अनेक बैठका घेतल्यावर आणि तपासणी केल्यानंतर या समितीने उड्डाणपुलासाठी तीन जागा सूचित केल्या. यात कोंब लेव्हल क्रॉसिंग आणि पालिका उद्यान या जागा समाविष्ट होत्या. राज्याच्या महसुलात मोठय़ा प्रमाणात योगदान देणाऱया या व्यावसायिक राजधानीला योग्य विकासासाठी योग्य वाटा द्यावा आणि कोंब येथील उड्डाणपुलाला प्राधान्य देऊन त्याचे काम त्वरित हाती घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असे कुतिन्हो यांनी सांगितले आहे.