स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी : 58 वॉर्डांची जबाबदारी केवळ 14 स्वच्छता निरीक्षकांवर
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करून स्वच्छता करण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपविण्यात आली आहे. मात्र सदर काम व्यवस्थित करवून घेण्याची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची आहे. पण महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची संख्या कमी असून 58 वॉर्डाची जबाबदारी केवळ 14 स्वच्छता निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
महापालिकेचे 58 वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. कचऱयाची उचल करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी 25 कोटींचा निधी खर्च केला जातो. तरीदेखील शहराची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचलेले असतात. काही ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. दररोज घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जात नसल्याने नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असतात. पण स्वच्छतेचे काम व्यवस्थित केले जाते का? यावर नजर ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची आहे. यापूर्वी 58 वॉर्डाकरिता 10 स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या नोकर भरती नियमावलीनुसार 23 स्वच्छता निरीक्षकांच्या जागा आहेत. पण यापैकी केवळ 14 जागांवर स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे प्रत्येक स्वच्छता निरीक्षकांकडे चार ते पाच वॉर्डांमधील स्वच्छतेच्या कामावर नजर ठेवावी लागते. शहराची व्याप्ती वाढत चालल्याने स्वच्छता निरीक्षकांना दररोज शहरात फेरफटका मारता येत नाही. त्यामुळे तक्रार असलेल्या ठिकाणी पाहणी करून समस्येचे निवारण केले जाते. पण नियमितपणे फेरफटका मारून स्वच्छतेचे काम व्यवस्थित होते का? याची पाहणी केली जात नाही. त्यामुळे स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. स्वच्छता निरीक्षकांच्या नऊ जागा रिक्त असून या नऊ स्वच्छता निरीक्षकांची जबाबदारी 14 स्वच्छता निरीक्षकांकडे प्रभारी कार्यभार म्हणून सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था स्वच्छता निरीक्षकांची झाली आहे.
आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षकांना सूचना करणे आवश्यक
अशातच व्यवसाय परवान्यासाठी पाहणी करणे, जन्म-मृत्यू दाखल्याची शहानिशा करण्याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. परिणामी या कामासाठी धावपळ करावी लागते. तसेच मुख्य कार्यालयात भेट देणे व अन्य कामाची जबाबदारी देण्यात येते. त्यामुळे स्वच्छता निरीक्षकांच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. स्वच्छता निरीक्षकांचे संख्याबळ अपुरे आहेच, तर सेवा बजावत असलेले काही स्वच्छता निरीक्षक व्यवस्थितपणे आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यामुळेच शहरवासियांना अस्वच्छता, दुर्गंधी आणि सांडपाणी साचण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिका आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याची सूचना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.