ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमतानं निवड झाली. त्यानंतर सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. नार्वेकर हे विधानसभेचे देशातील सर्वात तरूण अध्यक्ष ठरले आहेत. विधिमंडळात आता जावई आणि सासऱ्यांचं ‘वर्चस्व’ राहणार आहे. पु. ल. देशपांडे म्हणायचे जावई आणि सासऱ्याचं कधी पटत नाही. पण इथे तसं होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे, असे सांगत फडणवीसांनी नार्वेकरांची फिरकी घेतली.
फडणवीस म्हणाले, विधिमंडळ सभागृहाच्या अध्यक्षस्थानाला विशेष महत्व आहे. हे कायदेमंडळ आहे. गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो किंवा कर्नाटक, गोव्याच्या सीमेवरचा सीमेवरील माणूस असो. प्रत्येकाचा विचार, आशा-आकांक्षा या सभागृहात प्रतिध्वनित होतात. आणि छोटय़ातले छोटे प्रश्न सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे. त्यामुळे या सभागृहाचे अध्यक्ष होणं, हा भाग्याचा योग असतो. इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या सभागृहात सासरे सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी जावई असा योगायोग जुळून आला आहे. पु.ल.देशपांडे म्हणायचे जावई आणि सासऱ्याचं कधी पटत नाही. पण तसं इथं होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे.
सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. खरंतर हे कठीण काम आहे, ज्याच्या बाजूने निर्णय येतो त्याला तो न्याय वाटतो. ज्याच्या विरोधात निर्णय येतो त्याला तो अन्याय वाटतो. एक त्यांची एक आमची बाजू असते. पण एक तिसरी बाजू असते ती खरी बाजू असते आणि त्या खऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतिध्वनित करण्याचं काम हे अध्यक्षांना करावं लागतं. मला अतिशय आनंद आहे तुमच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो.