विठुरायाच्या दर्शनानंतर तृप्त मनाने तमाम वारकरी आणि भाविक आपापल्या गावाकडे मार्गस्थ होत आहेत. परतवारी सुरू झाल्यानंतर पावसाला एकदमच सुरूवात झाल्याने अवघा मराठी समाज आनंदून गेला आहे. मराठवाडा, विदर्भाचे काही जिल्हे आणि सोलापूरसह माणदेश पावसाने न्हाऊन निघाला आहे. एरवी, पेरणी करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा शेतकरी-वारकरी पिकपाण्याची सगळी भिस्त विठुरायावर ठेवतो. मृगासह जून महिन्यातील काही नक्षत्रे कोरडी गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱयाने पंढरीरायापुढेच करूणा भाकली होती. ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या जसजशा पंढरीच्या दिशेने येऊ लागल्या तसतसा पावसाने जोर धरायला सुरूवात केली. गोल रिंगण, उभे रिंगण पावसात निथळून झाले. धूळपेरणी करून पंढरीरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाबडय़ा भाविक वारकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या. कोसळत्या पावसात सुमारे दहा लाखांहून अधिक भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. काहींनी कळसाचे दर्शन घेतले, काहींना मुखदर्शन झाले. हा सगळा उत्सव उत्साहाने पार पडला. तीनेक लाख लोकसंख्येच्या पंढरपूरात दहा लाख भाविक आल्यानंतर जी दूरवस्था होते, ती स्थानिकांना नवी नाही आणि दरवषी वारी करणाऱयांनाही नवी नाही. आता परतवारी सुरू आहे. रेल्वे, एसटी बस आणि मिळेल त्या खासगी वाहनाने वारकरी परतीच्या मार्गावर आहेत. कोरोनानंतर इतक्मया मोठय़ा प्रमाणावर झालेली ही पहिलीच वारी म्हणावी लागेल. पंढरपूरची आषाढीवारी ही केवळ भक्तीचा महापूर नसते, ती जीवनदायी असते. पुढील वर्षभराचे जगणे सुसह्य करण्याचे सामर्थ्य या वारीवर अवलंबून असते. कारण केवळ परगावाहून आलेले भाविक-वारकरीच नव्हे तर स्थानिक व्यावसायिक वारीत होणाऱया आर्थिक उलाढालीवर विसंबलेले असतात. धूळपेरणी आणि क्वचित मृग नक्षत्र लाभले तर पेरणी करून निश्चिंत मनाने आलेला वारकरी आषाढसरी आणि विठुरायावर भिस्त ठेवून असतो. ‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ ही कृतार्थतेची भावना त्याच्या मनात असते. सगळय़ा क्षेत्रांना हा पहिला पाऊस उल्हसित करत असतो. भरून वाहणारे नदी-नाले अवघ्या सृष्टीला नवचैतन्य बहाल करत असतात. ‘अवघी सृष्टी झाला हरी’ ही अनुभूती पाऊस देतो. धरणे भरली की वर्षभर पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची निश्चिंती होते. पीकपाणी उत्तम झाल्याने सगळय़ाच व्यापाराची भरभराट होते. काही विचारवंतांना यामध्ये अंधश्रद्धेचा वास येऊ शकतो. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धेत एक धूसर रेष आहे. ती ओळखता आली पाहिजे. वारीत सामील होणारे वारकरी-भाविक कर्मावर म्हणजे आपल्या कष्टावर, मेहनतीवर अवलंबून असतात. पेरणी करून दर्शनाला आलेला भाविक हाताला यश मिळण्यासाठी आशीर्वाद मागत असतो, प्रार्थना करत असतो. प्रार्थना दुबळय़ांच्या मुखात शोभत नसते. वारकरी बलवान आहे. ज्ञानेश्वरांनी मागितलेल्या पसायदानाची ताकद त्यांच्या प्रार्थनेत असते. वारी हे अशा कर्मवीरांचे श्रद्धास्थान आहे. कित्येक वर्षांची परंपरा असलेल्या वारीला अंधश्रद्धेचा मुलामा देऊन निकालात काढणे न्यायोचित नाही. त्यामुळेच पु. ल. देशपांडेंसारखा नास्तिक साहित्यिक किंवा शरद पवारांसारखे राजकारणी विठुरायाची ताकद जाणून होते. त्याचे सगुण साकार रूप लाखो लोकांना जगण्याची, जीवनातील संघर्षाशी प्रामाणिकपणे झुंजण्याची ताकद देते, ‘जो जे वांछिल ते तो लाहो’ अशी सगळय़ांच्या कल्याणाची कामना पूर्ण करते ही एक विलक्षण घटना आहे. दरवषी वारी होते, दरवषी असा उल्हासाचा, कैवल्यानंदाचा अनुभव येतो. या अनुभवाचे विश्लेषण भल्याभल्यांना करता आलेले नाही. आपल्याला झालेल्या आनंदाचे दर्शन इतरांना जरूर होते, पण आनंद म्हणजे काय, याचे नेमके स्वरूप उलगडता येत नाही. आनंद कशामुळे होतो, ते सांगता येईल. पण म्हणजे काय याचे स्पष्टीकरण देता येत नाही. सर्वस्वाला व्यापून टाकणारी आणि इतरांना त्यात सामील करून घेणारी अशी ही व्यापक अनुभूती आहे, जी त्या विठुरायाच्या नुसत्या दर्शनाने मिळते. अन्यथा घरदार सोडून तीन-चार आठवडे चालत आणि 28-30 तास दर्शनाच्या रांगेत ऊन-वारा-पाऊस झेलत उभ्या राहणाऱया वारकऱयाला चरणस्पर्श दर्शनाने काय मिळते? ‘पाहीन श्री मुख आवडीने’ असे म्हणत ते सावळे मनोहर रूप क्षणभर पाहून अंतरातील कोणत्या वृत्ती पालवतात? विज्ञानाने या मनोवस्थेचे नेमके विश्लेषण केले पाहिजे. अनंत अडचणींना तोंड देत पंढरपुरात पोचल्यानंतर कित्येकांना गर्दीमुळे केवळ कळसाचे दर्शन घेऊन परतावे लागते, तरीही त्यांचे तन आणि मन पुलकित होऊन गेलेले असते. अनेकांच्या डोळय़ांत कृतार्थतेच्या अश्रुधारा वाहत असतात. लक्षावधी भाविकांच्या या मनोवस्थेबाबत विचारवंतांना, मनोविश्लेषण करणाऱयांना आणि तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱयांना नेमकेपणाने सांगता आलेले नाही. ‘आपणासारखे करिशी तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी’ हा आनंदोत्सव वाटण्याचा प्रकार कुठल्याही बाह्य उपचारातून होत नाही. म्हणूनच वारकरी श्रीविठ्ठल स्वरूप समजून एकमेकांच्या पायावर डोके ठेवतात. त्यात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेद नसतो. ‘तुझे पायी माझा माथा’ या भावनेचे स्पष्टीकरण करता येणार नाही. जगातील कोणत्याही देशात, ‘दर्शन घेऊन आलेल्या भाविकात’ त्या देवाचेच प्रतिरूप पाहण्याची भावना इतक्मया उत्कटतेने जागृत झालेली पहायला मिळत नाही. हे जाणून घेण्यासाठी शेकडो नव्हे हजारो परदेशी नागरिक आपापल्या देशांमधून पंढरपुरात येऊन वारी अनुभवून गेले आहेत. कित्येकांना या सावळय़ा विठ्ठलाने वेड लावले, पण म्हणजे काय झाले हे तेही सांगू शकले नाहीत. श्री विठ्ठलदर्शन घेऊन पंढरीतून समाधानाने प्रस्थान करणाऱया वारकऱयांचा भाव अलौकिक आहे. त्याला लौकिकरूपात बद्ध करता येणार नाही. कटेवर हात ठेवून विटेवर उभ्या असलेल्या त्या सावळय़ा चैतन्याने पर्जन्यवृष्टीमुळे परतवारीही अमाप सुंदर करून टाकली आहे.
Previous Articleराशीभविष्य
Next Article मॅक्रोटेक डेव्हलपर्स 50 कोटी डॉलर्स गुंतवणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.