प्रितम निकम/शिराळा
शिराळा तालुक्यात एक दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून चांदोली धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या ६०.१५ एवढा पाणी साठा आहे. तर शिराळा तालुक्यात सर्वात जास्त चरण येथे ५४९.५ मिमी तर कोकरुड येथे ५०७.६ मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. तसेच सर्वात कमी पावसाची नोंद शिरसी येथे २१२.६ मिमी एवढी झाली आहे.
जिल्ह्यात नदी, ओढे, पाझर तलावासह धरणांमधील पाणी साठा दिवसेनदिवस वाढत असून तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. नाले, ओढे खळखळून वाहू लागले आहेत. दिवसभर दमदार पाऊस सुरू असल्याने वाढल्याने सोमवारच्या आठवडी बाजारात व्यापार्यांनी अवस्था दयनीय झाली होती. तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शिराळा तालुक्यात कोकरुड ४१.३ (५०७.६), मि.मि. शिराळा २१.८ (५०७.६), मि.मि शिरसी २२ ( २१२.६ ), मि. मि. मांगले २३.५ ( २९६.४ ), मि.मि.सांगावं २८ ( ३४६.४) मि.मि. चरणं ६७.५ ( ५४९.२ ) मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तर चांदोली धरणात ५९.६९ टक्के पाणी साठा झाला आहे. पावसाची दमदार सुरुवात झाल्यामुळे शिराळा पश्चिम भागात सध्या पावसाची तमा न बाळगता भात पिकांची रोप लागण सुरू आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती उपयुक्त पाऊस पडत आहे. भुईमूग, सोयाबीन पिकांची व धुळवाफ भात पिकांची वाढ जोमात सुरू आहे.
हे हा वाचा : राधानगरी धरण 60 टक्के भरले,1400 क्यूसेकने विसर्ग सुरू
शिराळा तालुक्यात भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर भात रोपांची लागण ही बहुतांश पुर्णत्वास आली आहे. यावर्षी भात पिकांचे क्षेत्र जवळपास १२,४०० हेक्टर आहे. धूळवाफेवरील पेरणी झालेल्या भात पिकास पावसाने उघडीप दिल्याने मरगळ आली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्यामुळे सदर धुळवाफ भात पिकास जिवदान मिळाले आहे. यंदा भात उगवण चांगली झाली पण पाऊस नसल्याने भात पिकांची वाढ खुंटली होती. परंतु वेळीच पावसाने सुरुवात केल्यामुळे आता तालुक्यात पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत यावर्षी वळीव पावसाने पुर्णपणे दडी मारल्याने विहिरी, धरणे, नद्या, यांनी अनेक महिन्यांपूर्वीच तळ गाठला होता . पावसाने अचानक दमदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे.त्यामुळे शेतकरीवर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच शिराळा येथील तहसीलदार गणेश शिंदे यांनी परस्थितीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी आपाआपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत व नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.