खासदारांच्या गटाला स्वतंत्र दर्जा देण्यावर आक्षेप
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या बंडखोर खासदारांच्या गटाला स्वतंत्र गटाचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली होती. त्या निर्णयाविरोधात ही याचिका आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली ही सातवी याचिका असल्याचे स्पष्ट होत आहे. आधीच्या याचिकांवर 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. नवी याचिकाही याच याचिकांना जोडून घेतली जाईल, अशी शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. त्याविरोधातही ही याचिका सादर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनी प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना लोकसभेत वेगळा गट म्हणून मान्यता द्या असे आवेदनपत्र शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले होते. तसेच शिंदे गटाने खासदार भावना गवळी यांची निवड मुख्य प्रतोदपदी करावी अशी मागणी केली होती. या मागण्या मान्य झाल्या होत्या.
मोठय़ा पीठाकडे जाणार ?
शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांनी मिळून एकंदर 9 याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या आहेत. त्यामध्ये घटनेचे 10 वे परिशिष्ट, विधानसभाध्यक्षांचे अधिकार, आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाराचा प्रश्न आदी बऱयाच जटील मुद्दय़ांचा समावेश आहे. त्यामुळे यांपैकी काही महत्त्वाचे मुद्दे मोठय़ा घटनापीठाकडे (5 किंवा 7 सदस्यांच्या) देण्याचा विचार सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी बोलून दाखविला होता. 1 ऑगस्टला या संबंधीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.