अध्याय एकोणिसावा
उद्धवाच्या प्रश्नांना भगवंत सविस्तर उत्तर देत आहेत. ते म्हणाले, ज्याच्या मनात चित्तविक्षेप असतो, तो शंकेखोर असतो आपल्यापेक्षा कुणी श्रे÷ होऊ नये म्हणून तो मत्सरपूर्वक गुरुतील दोष दाखवतो, सुहृद आप्तांशी रागाने वागतो, मातापित्यांचा धिक्कार करतो. तो आपल्या सन्मानासाठी साधुसंतांशी द्रोह करतो, जो जागोजागी फक्त दोष पाहतो, जो दुसऱयाचे दोष उच्चारतो, जो दुसऱयाची निंदा करितो, त्याला चित्तभ्रंश विकार झाला म्हणून समजावे.
जो सन्मार्गापासून निघून अधर्मात किंवा अकर्मात पडतो, तोही उद्धवा! खरोखर चित्तभ्रंशच होय. आपण खरोखरीच परब्रह्म आहोत हे वेदात सांगितलेले वचन जाणून घेणे हाच उत्तम ‘वेदमार्ग’ होय पण हे लक्षात न घेता जो लोभ धरून वागतो तो वाईट मार्गाला लागतो. आता स्वर्ग शब्दाचा अर्थ असा की, ज्याच्या योगाने आत्मसुखाची प्राप्ती होते असा जो सत्त्वगुण तो खरा स्वर्ग होय. इंद्रलोकाला जाणे हा स्वर्ग नव्हे कारण इंद्रलोकाला जे जातात ते पुन्हा माघारे येतात पण शुद्धसत्त्वामध्ये जे मिसळतात, ते निजसुखाला पोचतात. असा जो का सत्वगुण तोच येथे ‘स्वर्ग’ असे समजावे.
आता नरकाचेही सर्व लक्षण तुला सांगतो. तमोगुणाची वृद्धीच नरक होय. गुरू हाच खरा बंधू होय आणि तो गुरू मी आहे. हे मनुष्यशरीर हेच खरे ‘घर’ आहे. तसेच जो गुणांनी संपन्न आहे तोच ‘धनवान’ समजावा. काम, क्रोध आणि लोभ यांच्या ज्या उसळय़ामुळे महामोह खवळून उठतो. तो ज्ञानासहवर्तमान विवेकाला बुडवून
टाकतो.
अशाने एकटा तमोगुणच वाढत असतो. अरुणोदयाच्या वेळी धुकेच धुके माजून राहते, गर्द अंधार होतो, त्यावेळी सूर्यचंद्रही दिसत नसल्यामुळे आता दिवस आहे की रात्र आहे ही स्थिती कळत नाही. ह्याप्रमाणे आपल्या चित्तात अंधतम वृत्ती वाढून राहते आणि कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते, यापैकी एकही स्फूर्ति स्फुरत नाही असा जो तमोगुणाचा उन्नाह म्हणजे उदेक होतो. त्याचेच नाव महानरक होय.
यमयातनेचे जे दुःख त्याला नरक म्हणू नये कारण यमयातनेने पाप झडून जाते पण महामोहाने पाप वाढत असते. यमलोकातले नरक यापुढे तुच्छ होत. महामोहातले नरक हेच मोठे नरक समजावे. काम, क्रोध आणि लोभ हे तिघे नरक देणारे आहेतच, त्यात महामोह एक मिळाला म्हणजे ‘अंधतम’ बनतो. इतका समुदाय जेव्हा एकत्र जमतो, तेव्हा त्याला ‘तमउन्नाह’ असे म्हणतात. इतकी ज्याची स्थिती घडून येईल तो पुरुष ‘नरकरूपच’ समजावा.
जो घोर नरकाला जातो त्याचा येथून उद्धार तरी होतो पण ज्याला ‘तमउन्नाह’ प्राप्त होतो, त्याचा महाकल्पांतीही उद्धार होत नाही. अशी तमउन्नाहाची ख्याती श्रवण करून उद्धवाच्या मनात कंटाळा आला आणि तो मनात म्हणाला की, अशा तमोवृत्तीत बुडणाऱया जीवांचा उद्धार तरी कोण करणार? उद्धवाच्या मनात आलेला प्रश्न जाणून देवाधिदेव म्हणाले, अशा बुडणाऱया लोकांचा निज सखा असलेला गुरु उद्धार
करतो.
आता असा गुरु कोण? असे म्हणशील, तर मी नित्य ज्याच्या पायाला लागतो, जो चिन्मात्र ब्रह्मरूप प्राप्त करून देतो, त्यालाच ‘गुरु’ असे म्हणतात. गुरूची योग्यता ब्रह्मापेक्षाही अधिक आहे कारण ब्रह्माला ‘हे ब्रह्म’ म्हणून प्रतिपादन करणारा अथवा दाखवून देणारा तो असतो. ते अज आहे, अव्यय आहे, तसेच अनंत, अच्छेद्य, अभेद्य व अपरिमित आहे, अशा प्रकारचा ब्रह्माचा सारा महिमा सद्गुरूंनीच जगात प्रसृत केला
आहे.
अशी सद्गुरूची कीर्ति श्रवण केल्याने जडजीवांचा उद्धार होतो. ‘गुरु’ नामाची ख्याती फार मोठी आहे. ती ऐकून यम व काळसुद्धा कापू लागतात. त्या सद्गुरूचा महिमाच बुडत्याचा उद्धार करतो, आणि जन्ममरणाचे निवारण करून शिष्याला समाधान देतो. शिष्याचा आप्त, सखा, बंधु सर्व सद्गुरुच असल्याचे प्रसिद्ध आहे. तोच नरकाचा संबंध चुकवून परमानंद सुख देणारा आहे.
क्रमशः