गणेश विसर्जनावेळी पंचगंगा नदी, रंकाळा तांबट कमान, कोटीतीर्थ तलावामध्ये प्रयोग
बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर
गणेश मूर्तीवरील रासायनिक रंग आणि निर्माल्य पाण्यात मिसळल्यास पाण्याचे प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा शहरातील निवडक विसर्जनठिकाणी पाण्यातील रासायनिक घटक शोषून पाणी शुध्दीकरण करणाऱ्या वनस्पतींचे तरंगते तराफे (फ्लोटिंग बेड) सोडण्यात येणार आहेत. पुण्यानंतर कोल्हापुरात असा प्रयोग पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर यंदाच्या गणेशोत्सवात केला जाणार आहे.
किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर्स आणि किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे पर्यावरणविषयक उपक्रम राबवणाऱ्या किर्लोस्कर कंपनीकडून तरंगत्या तराफ्याचा (फ्लोटिंग बेड) प्रयोग करण्यात येणार आहे. दोन वर्षापूर्वी हा प्रयोग पुण्यातील राम नदी जीर्णोध्दार मोहिमेत केला होता. त्यावेळी हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यावर्षी गणेशोत्सवात जनजागृती व्हावी यासाठी असे तरंगते तराफे पंचगंगा नदी, रंकाळा तांबट कमानीजवळ आणि कोटीतीर्थ तलावात सोडण्यात येणार आहेत. शनिवारी या महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते या तरंगत्या तराफ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
काय आहेत तरंगते तराफे (फ्लोटिंग बेड)
पाणवनस्पतीचे एक नावीन्यपूर्ण व्यवस्थापन. यामध्ये एक तरंगता तराफा वापरुन त्यावर विशिष्ट पाणवनस्पती लावली जाते. ही वनस्पती पाण्यातून प्रदूषित करणारे काही धातू शोषून घेते आणि चौकटीमुळे वनस्पतीचा अवास्तव प्रसार होत नाही. पाणवनस्पतीमध्ये कर्दळ, देशी मोहरी आणि वाळाच्या मुळाचा वापर करण्यात येणार होतो.
वनस्पती असे करतात कार्य
- कर्दळीची मुळे पाण्यातून कॉपर, लीड, निकेल, कॅडमियम, झिंक अशी खनिजे शोषून घेतात.
- देशी मोहरीची मुळे लीड आणि निकेल धातू शोषून घेतात.
- वाळाची (वाळा) मुळे कॉपर, लीड आणि झिंक धातू शोषून घेतात.
शाळा-गाव पातळीवर जाणीवजागृती करणार
तरंगत्या तराफ्यातील कर्दळ, वाळा आणि मोहरी वनस्पतींमुळे पाण्यातील विषारी घटक शोषून घेतले जातात. पाणी शुध्द होण्यास मदत होते. जलस्त्रोतामध्ये असे प्रयोग केल्यास पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. किर्लोस्कर लिमिटेडतर्फे गावागावात, शाळा-कॉलेज-पातळीवर जाणीवजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
शरद आजगेकर, सामाजिक बांधिलकी अधिकारी, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स.