गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
अनेक खाती कवटाळून बसलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आता त्या खात्यांचा भार पेलवेनासा झाला आहे. त्याशिवाय राज्यहितापेक्षा स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठीही त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. त्याचा फायदा घेत गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले असून राज्यातील लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी ही मागणी केली आहे. राज्यात गुन्हेगारी प्रमाणाबाहेर वाढली आहे. त्याचा परिणाम पर्यटन उद्योगावर होत आहे. खाणी बंद पडल्याने राज्यासाठी पर्यटन हाच उत्पन्नाचा स्रोत शिल्लक राहिला आहे. परंतु कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पर्यटन उद्योगावर विपरित परिणाम होईल, अशी भीती पालेकर यांनी व्यक्त केली.
पोलीस सक्षम आहेत. परंतु ’जसा राजा तशी प्रजा’ या उक्तीनुसार जसे सरकार तसे पोलीस खाते असा प्रकार बनला असून त्याचा प्रत्यय अनेक भयानक घटनांमधून येत आहे. भरीस सरकारमधील मंत्री, आमदार यांचा पोलीस खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळेही गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीस असमर्थ ठरत आहेत, असे पालेकर म्हणाले.
या पत्रकार परिषदेत बोलताना उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी, अनेक प्रकरणात पोलीस केवळ गुन्हे दाखल करत आहे. प्रसारमाध्यमे किंवा कौटुंबिक दबावामुळे त्यांना तसे करणे भाग पडत आहे. मात्र पुढे काहीच होत नाही. सोनाली फोगट मृत्यू प्रकरण, मांडवी पुलावरील अपघात यासारखी काही प्रकरणे त्याची उदाहरणे आहेत. मांडवी पुलावरील अपघात प्रकरणात तर अद्याप कारचालक किंवा त्यातील प्रवासी यापैकी कुणालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही, असे नाईक म्हणाले.