भाजप खासदार राज्यवर्धन राठौड यांची टीका
वृत्तसंस्था/ जयपूर
भाजप खासदार तसेच राष्ट्रीय प्रवक्ते कर्नल राज्यवर्धन राठौड यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली आहे. बलात्काराच्या प्रकरणातील 56 टक्के पीडिता खोटं बोलत असतात असे गेहलोत यांनी म्हटले होते. गेहलोत यांचे हे वक्तव्य लाजिरवाणे आहे. राजस्थानात भीतीचे वातावरण असून राज्य आता धर्मांधांचा अड्डा ठरला आहे. दिल्लीत काही घडताच ते त्वरित तेथे धाव घेतात. परंतु राजस्थानातील घटना त्यांना क्षुल्लक वाटत असल्याचे म्हणत राज्यवर्धन यांनी गेहलोत यांना लक्ष्य केले आहे.
एनसीआरबीने अलिकडेच गुन्हय़ांशी संबंधित आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार राजस्थानात बलात्काराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. ही माहिती समोर येताच भाजपने गेहलोत सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. भाजपच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी महिलाविरोधी नोंद झालेल्या गुन्हय़ांपैकी 56 टक्के प्रकरणे खोटी असतात असे धक्कादायक विधान केले होते.
राजस्थानात प्रतिदिन 17 महिलांवर बलात्कार होत आहे. राजस्थानात महिलांसोबत असे घडत असताना पाहून मोठे दुःख होते. राजस्थानात नेहमीच महिलांना सन्मान दिला जात राहिला आहे. परंतु गेहलोत यांच्या शासनकाळात राजस्थान आता रेप कॅपिटल ठरले असल्याचा आरोप राज्यवर्धन राठौड यांनी केला आहे.