ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रात लोकसभेसाठी मिशन ४५ राबविण्याची भाजपची तयारी सुरू झाली आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत पुढील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झालीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज बारामती (aramati दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली. यावेळी बावनकुळेंनी पुढील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा एकत्र लढणार असल्याचं देखील जाहीर करतानाच या युतीच्या माध्यमातून विधानसभेत २०० हून जास्त तर लोकसभेत राज्यातून ४५ हून जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
दरम्यान, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात पहिला दौरा असून तोही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीतून. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, त्याच मंदिरात आज चंद्रशेखर बावनकुळे जाणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार गेली ५५ वर्ष राजकारणात आहेत. निवडणूक कोणतीही असो, आपल्या प्रचाराचा नारळ ते कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फोडतात अन् निवडणुकीच्या मैदानात उतरतात. गेल्या ५५ वर्षात पवार एकही निवडणूक हरलेले नाहीत. आज बावनकुळे कन्हेरीच्या मंदिरात जाऊन ‘बारामती मोहिम’ फत्ते करण्यासाठी बजरंगबली हनुमानाचा आशीर्वाद घेतील.
हे ही वाचा : कुणी आल्या-गेल्याने सेनेचा विजय थांबणार नाही, अंबादास दानवेंनी भाजपला सुनावले
“येत्या दोन महिन्यात मी सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. आमच्या संघटनेच्या माध्यातून पुढच्या काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेना आणि भाजपा युतीच्या माध्यमातून ४५ हून जास्त जागा जिंकून आणू”, असंही बावनकुळेंनी नमूद केलं.
बारामती विजयाचा निर्धार-
दरम्यान, यावेळी बोलताना बावनकुळेंनी बारामतीची लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. “केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण पूर्णवेळ प्रभारी आहेत. पुढच्या १८ महिन्यांत निर्मला सीतारमण ५ ते ६ वेळा बारामती दौऱ्यावर येऊन प्रत्येक वेळी तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. इथल्या विकासाची परिस्थिती काय आहे, केंद्राकडून विकासाबाबत काय अपेक्षा आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून काय करता येईल या दृष्टीने या दौऱ्यांमध्ये विचार करण्यात येईल”, असं बावनकुळे म्हणाले. याच निमित्ताने १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर असणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा त्या आढावा घेणार आहेत.