मुख्यमंत्र्यांची वरिष्ठ अधिकाऱयांसोबत बैठक : पारंपरिक व्यावसायिकांना प्राधान्य,अवैध उत्खननावर कडक नजर ठेवण्याच्या सूचना
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील पारंपरिक रेती व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत असून तसे संकेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. त्यादृष्टीने गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने अधिकाऱयांच्या बैठका घेतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली. रेती उत्खननात पारंपरिक व्यावसायिकांना प्राधान्य देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माड-बाणसाय, कुडचडे येथे गत आठवडय़ात रेती व्यवसायातील स्पर्धेतून घडलेल्या गोळीबार प्रकरणानंतर राज्यातील रेती उत्खननाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतला आहे. सदर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून सोमवार व मंगळवार असे दोन दिवस संबंधित अधिकाऱयांच्या बैठका घेतल्या. सोमवारी झालेल्या बैठकीस राज्याचे ऍडव्होकेट जनरल, मुख्य सचिव, पोलीस महानिरीक्षक, अन्य सचिव, जिल्हाधिकारी यांच्यासह खाण व भूगर्भ खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रेती व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व कायदेशीर बाबी सुव्यवस्थित करण्याचे आदेश खाण खात्याच्या अधिकाऱयांना दिले. त्याचबरोबर शेजारील राज्यातून वाळू किंवा अन्य गौण खनिजांची वाहतूक करण्यासाठी ऑनलाईन ट्रान्झिट पास प्रणाली सुटसुटीत करावी, असेही सांगितले.
दरम्यान, गौण खनिजांशी संबंधित सर्व प्रलंबित अर्जांवर प्राधान्याने प्रक्रिया करण्याचे निर्देश देतानाच अवैध उत्खननावर कडक नजर ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी खाण खात्याच्या अधिकाऱयांना दिल्या.