अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोटला जनसागर : आजी-माजी लोकप्रतिनिधींची उपस्थिती
वार्ताहर /हुक्केरी
कर्नाटक राज्याचे अन्न-नागरी पुरवठा व वनमंत्री उमेश विश्वनाथराव कत्ती (वय 61) यांचे मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. या वृत्तानंतर त्यांच्या बेल्लद बागेवाडी गावासह संपूर्ण हुक्केरी तालुक्यात शोककळा पसरली. बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास बेल्लद बागेवाडी येथील मळय़ात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी सामान्य कार्यकर्त्यांसह राज्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. अंत्यविधीला अलोट जनसागर लोटला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना दुःखाश्रू अनावर झाले.
मंत्री उमेश कत्ती मंगळवारी सायंकाळी 4 वाजता आपल्या बेल्लद बागेवाडी गावातून बेंगळूरकडे रवाना झाले होते. दरम्यान बेंगळूरमधील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी रात्री 10.30 च्या सुमारास बाथरुममध्ये हृदयविकाराचा धक्का बसल्याने ते खाली कोसळले. त्यानंतर कत्ती यांना तातडीने बेंगळूर येथील एम. एस. रामय्या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उमेश कत्ती यांच्या अकाली निधनाने राजकारणी व चाहत्यांना मोठा धक्का बसला. यानंतर मध्यरात्री त्यांचे कुटुंबीय बेंगळूरकडे रवाना झाले होते.
बेंगळूर येथून विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येथील सांबरा विमानतळावर बुधवारी आले. तेथून सजविलेल्या मिलिटरी वाहनातून त्यांचे पार्थिव बेल्लद बागेवाडीकडे आणण्यात आले. यावेळी मार्गावरील यमकनमर्डी, हत्तरगी, हिडकल डॅम क्रॉस, बडकुंद्री क्रॉस, गौंडवाड क्रॉस, हुक्केरी शहर, हुल्लोळी, हुल्लोळहट्टी, सारापूर आदी ठिकाणी हजारो नागरिकांनी या वाहनास थांबवून मंत्री उमेश कत्ती यांचे अंतिम दर्शन घेतले.
अंत्यदर्शनासाठी हजारोंचा जनसागर
बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास पार्थिव बेल्लद बागेवाडी येथील विश्वनाथ शुगर्सच्या आवारात आणण्यात आले. येथे त्यांचे पार्थिव नागरिकांसाठी अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात आले. पार्थिव येथे येताच कत्ती यांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी आजी-माजी लोकप्रतिनिधींसह संघ-संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले. अंत्यदर्शन घेताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी चार मार्ग तयार करण्यात आले होते. यामध्ये महनीय व्यक्तींसाठी एक मार्ग तर अन्य तीन मार्गातून इतरांना प्रवेश दिला जात होता. सुमारे 70 ते 75 हजार जणांनी कत्ती यांचे अंत्यदर्शन घेतले.
रात्री 8.30 नंतर गावातील प्रमुख मार्गावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. गावात ठिकठिकाणी त्यांच्या वाहनावर पुष्पहार अर्पण तसेच फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल बनले हेते. अंत्ययात्रा त्यांच्या घराजवळ येताच उमेश कत्ती यांच्या पत्नी शीला व कुटुंबीयांना हंबरडा फुटला. तेथून पार्थिव त्यांच्या शेताकडे नेण्यात आले. तेथे कत्ती यांच्या आई-वडिलांच्या समाधी शेजारी वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. निडसोशीचे शिवलिंगेश्वर स्वामीजी, हुक्केरीचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी तसेच विविध मठाधीशांच्या उपस्थितीत विधी करण्यात आला.
याप्रसंगी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, कुडलसंगमचे जयमृत्युंजय स्वामीजी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, जगदीश शेट्टर, पालकमंत्री गोविंद कार्जोळ, विजयेंद्र येडियुराप्पा, माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, मंत्री शशिकला जोल्ले, सी. सी. पाटील, मनेनकोप्प, गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र, हालप्पा आचार्य, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी मंत्री एम. बी. पाटील, शशिकांत नाईक, मंत्री आर. अशोक, खासदार रमेश जिगजिनगी, आण्णासाहेब जोल्ले, मंगला अंगडी, पी. सी. गद्दीगौडर, आमदार रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, प्रकाश हुक्केरी, लखन जारकीहोळी, लक्ष्मण सवदी, महेश कुमठहळ्ळी, श्रीमंत पाटील, गणेश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी, अशोक पट्टण, भालचंद्र जारकीहोळी, अनिल बेनके, अंजली निंबाळकर, दुर्योधन ऐहोळे, पी. राजीव, महांतेश कवटगीमठ, डॉ. राजेश नेर्ली, राजू कागे, ए. बी. पाटील, महेश टेंगनीकाई, भाजपचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी, राज्याध्यक्ष नवीनकुमार कटील, लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा बँकेचे संचालक, कर्मचारी, विविध संघ-संस्थांचे सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कडेकोट बंदोबस्त
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये 5 डीवायएसपी, 15 सीपीआय, 25 पीएसआय, 700 पोलीस यांच्यासह 9 केएसआरपी वाहने, 5 डीआयआर वाहने तैनात करण्यात आली होती.
तिसऱयांदा हृदयविकाराचा झटका
मंत्री उमेश कत्ती यांचे 6 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता हृदयविकाराने निधन झाले. यापूर्वी कत्ती यांना 1997 मध्ये पहिल्यांदा हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यानंतर 2014 मध्येही त्यांना दुसऱयांदा हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र 6 रोजी बसलेल्या तिसऱया धक्क्याने त्यांना हिरावून घेतले.
वडिलांचेही सेवेत असताना निधन
मंत्री उमेश कत्ती यांचे वडील विश्वनाथ कत्ती हुक्केरी मतदारसंघातून 1985 मध्ये विधानसभेत निवडून गेले होते. विधानसभेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता. यात विश्वनाथ कत्ती यांचे निधन झाले. वडिलांप्रमाणेच आमदार पदावर कार्यरत असताना त्यांनाही काळाने कवटाळले.
संकेश्वर, हुक्केरीसह तालुका बंद
मंत्री कत्ती यांचे निधन झाल्याचे वृत्त हुक्केरी तालुक्यात समजताच मध्यरात्री 12 पासूनच सर्वत्रच शोककळा पसरली. बुधवारी सकाळी हुक्केरी, संकेश्वर, बेल्लद बागेवाडीसह अनेक गावांमध्ये दुखवटा पसरला होता. याठिकाणी सर्व व्यवहार बंद ठेवून मंत्री कत्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिग्गज नेत्याच्या जाण्याने मोठी हानी : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उमेश कत्ती यांच्या निधनामुळे आपल्याला खूप दुःख झाले आहे. कर्नाटकाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱया दिग्गज नेत्याच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशा शब्दात पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
राज्यात तीन दिवस दुखवटा
अन्न-नागरी पुरवठा व वनमंत्री उमेश कत्ती यांच्या निधनाने बेळगावसह संपूर्ण राज्यात तीन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी यासंबंधी एक अधिसूचना जारी केली आहे.
सरकारच्या सचिव अपेक्षा सतीश पवार यांनी ही अधिसूचना जारी केली असून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले आहे. दि. 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत तीन दिवस दुखवटा पाळण्यात येणार आहे. या काळात सरकारी कार्यालयांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्याची सूचना करण्यात आली आहे. या काळात कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम होणार नाहीत.
अंत्यक्रियेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बेळगाव जिल्हय़ातील शाळा-कॉलेज व सरकारी कार्यालयांनाही सुटी जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला एक दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला होता. सायंकाळी अधिसूचना जारी करून तीन दिवस दुखवटा पाळण्याचे सरकारने जाहीर केले आहे.