कराड प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी फॉस्ककॉनचा प्रकल्प गुजरातला पळवला. महाराष्ट्र शासन हा प्रकल्प तळेगाव दाभाडे येथे राबवण्यास तयार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही पद्धतीने तो गुजरातला गेला. प्रकल्पाला केंद्राची मदत हवी असेल तर तो गुजरातला करा असा दबाव कंपनीवर आणला गेल्याचा आरोप कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
दरम्यान देशात सध्या डबल इंजिन सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या प्रगतीवर होत आहे. असे असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते गप्प आहेत हे विशेष असाही आरोप चव्हाण यांनी केला.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री, खासदार म्हणून अनुभव असलेल्या पृथ्वीराजबाबा चव्हाण यांचा अभ्यासू राजकारणी म्हणून उल्लेख केला जातो. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांना अभ्यासपुर्ण विरोध करत रोखठोक बोलण्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय हातखंडा आहे. या पार्श्वभुमीवर सध्या देशात आणि राज्यात जो राजकारणाचा पट मांडला गेला आहे. यावरही ते स्पष्टपणे भाष्य करताना दिसतात. आज (गुरूवारी) त्यांनी आपली भुमिका स्पष्ट करत कॉंग्रेस पक्ष मजबुत करण्यासाठी आपण योग्य भुमिका घेत असल्याचे सांगितले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले
फॉक्सकॉनचा प्रकल्प अचानकपणे गुजरातला गेला अजुन जागा निश्चित नसताना हा प्रकल्प गेला हे निषेधार्ह आहे.
मी कॉंग्रेसचा विचाराचा…पक्षाला पुर्णवेळ अध्यक्ष हवा
मी कॉंग्रेस पक्षाच्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे माझ्याबाबत ज्या वावड्या उठत आहेत त्या चुकीच्या आहेत. कॉंग्रेसला पुर्णवेळ अध्यक्ष मिळावा ही आमची भुमिका होती. असे पत्र आम्ही सोनिया गांधी यांना दिले होते. त्यांनी आमची मागणी मान्य केली. याबद्दल त्यांचे आभार. कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मी लढवणार नाही. सध्या तो विचार नाही. कॉंग्रेस पक्ष मजबुतीने चालला पाहिजे ही भुमिका आहे.
कॉंग्रेस पक्ष हाच भाजपाला ठाम विरोध करू शकतो.
16 आमदारांना निलंबित करावे लागेल
शिंदे गट व भाजपा यांच्या सरकार स्थापनेविषयी बोलताना चव्हाण म्हणाले दहाव्या परिशिष्टानुसार माझा जो अभ्यास आहे त्याप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. 16 आमदारांनी पक्षांतर बंदी कायदा लागू होतो असे तज्ञांचे मत आहे. त्याचा निर्णय पहिला होणे अपेक्षित आहे मात्र याला विलंब होतोय हे दुर्दैवी आहे.
आझांदाच्या निर्णयाचे वाईट वाटले
सध्या सत्ताधारी पक्षाची विधीमंडळाची भाषा बदलली आहे. आमदारांवर दबाव टाकून विरोधी पक्षच संपवायचा ही कुटनिती त्यांची सुरू आहे. गुलाबनबी आझाद यांच्यासमवेत आम्ही 50 वर्षे एकत्र काम केले आहे. त्यांना भेटायला गेलो हे केवळ त्यांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मात्र याचा अर्थ आम्ही त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले असे होत नाही असे स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
सध्याचे सरकार तात्पुरते
न्यायालयाचा निकाल होईपर्यंत हे सरकार तात्पुरते आहे असे आपण तांत्रिकदृष्ट्या म्हणू शकतो. त्यामुळे जर न्यायालयाचा निकाल लागला आणि 16 जणांवर टांगती तलवार आली तर सरकार स्थिर रहावे यासाठी इतर पक्षातील आमदारांवर गळ टाकायचे प्रयत्न सुरू आहेत. जे तुम्ही ऐकताय की या पक्षातील आमदार फुटणार त्या पक्षाचे नेते फुटणार हे त्याचेच द्याेतक आहे.