ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं आज सकाळी नाशिकमधील खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
गावित यांनी प्रदीर्घ काळ आदिवासी समाजाचे नेतृत्व केले. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. 1965 साली ग्रामपंचायतीच्या राजकारणाला त्यांनी सुरुवात केली. 1981 साली पहिल्यांदा गावित खासदार झाले. तब्बल 9 वेळा नंदुरबार मतदारसंघात ते खासदार म्हणून निवडून आले होते. दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री होते. तसेच लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.
प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नाशिकधील खासगी रुग्णाल्यात उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार, तर मुलगा भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.