शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांचे प्रतिपादन
बेळगाव/ प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीत वाढ होत असल्याने त्यादृष्टीने शिक्षणात बदल करणे गरजेचे होते. त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 अंमलात आणण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बदल केला जात आहे. शिक्षणाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मध्यंतरीच्या दोन पिढय़ा वाया गेल्या असून थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु शिक्षणाची गुणवत्ता वाढेल, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले.
एसकेई सोसायटीच्यावतीने तरुण भारत ट्रस्ट पुरस्कृत डॉ. वाय. के. प्रभू- आजगावकर स्मृती व्याख्यानमालेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. जगन्नाथ पाटील बोलत होते. व्यासपीठावर एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, सेपेटरी आर. बी. देशपांडे, मधुकर सामंत, जगदीश कुंटे उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शैक्षणिक धोरणामध्ये अनेक बदल करण्यात आले. 1964-68 या दरम्यान कोठारी कमिशनने मांडलेले शैक्षणिक धोरण प्रभावी ठरले. कोल्हापूर परिसरातील जे. पी. नाईक हे या कमिशनमध्ये होते. शैक्षणिक धोरण ठरविण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यानंतर आता 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यात येत असून यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक बदल होणार आहेत. आंतरराष्ट्रीय शिक्षणाची देशातील शिक्षणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न एनईपीद्वारे करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात किरण ठाकुर म्हणाले, तात्या आजगावकर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी पहिल्यांदा आपल्या कुटुंबातील सर्वांना शिक्षण दिले. त्यानंतर समाजात तळागाळापर्यंत शिक्षण पोहचविले. वाढती लोकसंख्या ही शिक्षणासमोरील सर्वात मोठी समस्या असली तरी हीच लोकसंख्या पुढील काळात देशाच्या विकासात हातभार लावणारी आहे. शिक्षकांनी आपल्या जबाबदाऱया पार पाडल्या पाहिजेत. त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसना जावे लागणार नाही, असे वास्तव त्यांनी मांडले.
सोनाली पाटील यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. प्रा. प्रवीण पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. संजना पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी आभार मानले. यावेळी विविध कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते.
तरुण भारतमधून पत्रकारितेचा श्रीगणेशा
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेमध्ये पीएच.डी. मिळविली. त्यानंतर या क्षेत्राचा श्रीगणेशा तरुण भारत या वृत्तपत्रामधून केला. कोल्हापूर आवृत्तीमध्ये सहा महिने लिखाण केले. त्यामुळे वृत्तपत्र लेखनाची आवड निर्माण झाली. किरण ठाकुर यांच्यासारख्या पत्रकारितेतील भीष्मपित्याचे मार्गदर्शन मिळाल्याने प्रगती करू शकलो, असे शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी आवर्जुन सांगितले.