झाडशहापूर-खानापूरहून येणाऱया बसेस थांबवत नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त : शैक्षणिक नुकसान : यावर तोडगा काढणार कधी?
वार्ताहर /किणये
झाडशापूर-खानापूरहून येणाऱया बसेस मच्छे येथे थांबवत नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी मच्छे येथे पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन छेडले. ‘बस थांबवा अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडू’, असा इशाराही विद्यार्थी वर्गाने दिला आहे. रास्ता रोको केल्यामुळे मच्छेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती.
बेळगाव-पणजी महामार्गाजवळील नेहरूनगर मच्छे येथील बसथांब्याजवळ खानापूर व झाडशहापूर या भागातून येणाऱया बसेस थांबवत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना तासन्तास बसथांब्यावर ताटकळत बसावे लागत आहे. शाळा व कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना उशीर होऊ लागल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षापासून ही समस्या निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढणार कधी, असा सवालही विद्यार्थीवर्गातून उपस्थित करण्यात येत आहे.
400-500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
नेहरूनगर मच्छे परिसरात एक हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलमधून रोज सुमारे 400 -500 विद्यार्थी बेळगावला उच्च शिक्षणासाठी जातात. तसेच नेहरूनगर परिसरातील विद्यार्थी शाळा व कॉलेजला जातात. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी नेहमी असते. मात्र खानापूर व झाडशहापूर भागातून येणाऱया बसेस नेहरूनगर मच्छे येथे थांबवत नाहीत. विद्यार्थ्यांना पाहूनही वाहक व चालक बस तशीच पुढे घेऊन जातात. यामुळे विद्यार्थी अक्षरशः वैतागले आहेत.
मच्छे गावातील मुख्य बसथांब्याजवळ यापूर्वी गेल्या महिन्यातच मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी भेट देऊन मच्छे गावासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार झाडशहापूरला बस सुरू करण्यात आली आहे. मात्र झाडशहापूर व खानापूरहून येणाऱया बसेस नेहरूनगर मच्छे परिसरात थांबवण्यात येत नाहीत, अशी माहिती पालकवर्गाने दिली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना शाळा व कॉलेजला पाठवून द्यायचे कसे, असा सवालही पालकवर्गाने केला आहे.
अधिकाऱयांना जाग येत नाही.दाद मागायची कुणाकडे?
अनेकवेळा निवेदने देऊन, परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना सांगून रस्त्यावर रास्ता रोको करूनही अधिकाऱयांना जाग येत नाही. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे? असेही विद्यार्थी विचारत आहेत.
वाहनांच्या लांबच लांब रांगा
शनिवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान पुन्हा एकदा नेहरूनगरजवळ रास्ता रोको करण्यासाठी विद्यार्थीवर्ग मोठय़ा संख्येने जमा झाला होता. रास्ता रोको केल्यामुळे मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. यावेळी वडगाव ग्रामीण पोलीस दाखल झाले व त्यांनी विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले.
यावेळी पीएसआय लखाप्पा कोडणी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणपत जाधव, सचिन बेळगावकर, सतीश आदींसह नेहरूनगर भागातील विद्यार्थी, पालक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
परिवहन अधिकाऱयांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
परिवहन मंडळाचे अधिकारी बसाप्पा भोसले व त्यांचे सहकारी या ठिकाणी दाखल झाले. संतप्त विद्यार्थ्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना चांगलाच जाब विचारला. त्यानंतर तुमचा हा मुद्दा आणि या ठिकाणी बस थांबविण्याची समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. तुम्ही मंगळवारी परिवहन मंडळाच्या कार्यालयामध्ये या. आपण यावर सविस्तर चर्चा करू, असे परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी सांगितल्यानंतर सदर मोर्चा मागे घेण्यात आला.