ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी दिल्लीत मशिदीला भेट दिली. भागवत यांनी कस्तुरबा गांधी मार्गावरील या मशिदीला भेट दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीचे अनेक अर्थ काढत तर्क वितर्क लावले जात आहेत. यावेळी त्यांनी मुस्लीम नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. यावेळी मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलियासी (imam umer ahmed ilyasi) यांची भेट घेतली. बंद दाराआड झालेली बैठक जळवपास एक तास चालली.
या भेटीबाबत बोलताना उमर इलयासी यांचा मुलगा सुहैब इलयासी यांनी सांगितलं, “या भेटीने देशभरात एक चांगला संदेश गेला आहे. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे चर्चा केली. आमच्या निमंत्रणानंतर ते भेटीसाठी आले.”
या भेटीवर सरसंघचालक देशातील धार्मिक सौहार्द वाढवण्यासाठी मुस्लीम बुद्धीजीवींना भेटत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात येत आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर म्हणाले, “सरसंघचालक मोहन भागवत अनेक लोकांना भेटत आहेत. हा सातत्यापूर्ण ‘संवाद’ प्रक्रियेचा भाग आहे.”
या बैठकीनंतर आयएएनएसशी बोलताना इलियासी म्हणाले की, मोहन भागवत यांनी भेट घेणे हे आमचे सौभाग्य आहे. भागवत एका बैठकीसाठी इमाम हाउसमध्ये आले होते. तसेच ते राष्ट्रपिता आणि राष्ट्राचे ऋषी आहेत. देशाची एकता आणि अखंडता राखली पाहिजे. आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे पूजा करू शकतो, परंतु त्यापूर्वी आपण सर्व मानव आहोत. आम्ही भारतात राहतो आणि भारतीय आहोत.”