उमदी / वार्ताहर
जत तालुक्याच्या पाणी, रस्ते व अन्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, जत तालुका हा माझा पहिला मतदार संघ आहे. त्यामुळे जतच्या नागरिकांना मी कधीही विसरणार नाही. कोणत्याही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. जत तालुक्याच्या पाणी, रस्ते व अन्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी उमदी येथे नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तम्मानगौडा रवी पाटील, तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत उपस्थित होते.
उमदी ता. जत येथे संजय आण्णा तेली युथ फाउंडेशनच्यावतीने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा भव्य नागरी सत्कार व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांची उमदी गावातुन फुलांची उधळण करत ढोलताशांची आतशबाजी करत रथातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच पालकमंत्री सुरेश भाऊ खांडे व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते संजय आण्णा तेली युथ फाऊंडेशनतर्फे उमदी जि. प. गटातील लोकांसाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना पालकमंत्री खांडे म्हणाले की, ४२ गावांना पाणी मिळावे, पाण्याची समस्या दूर व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रयत्न करीत आहोत. म्हैसाळ योजनेला गती देण्यासाठी प्रयत्न केला तोपर्यंत पांढऱ्या पायाचे त्रिकूट सरकार आले आणि पुन्हा ही योजना बारगळली. मात्र आता केंद्रात व राज्यात आमचं सरकार आहे त्यामुळे आता म्हैसाळ योजनेचा पाठपुरावा करुन गती देऊ. कर्नाटकातून पाणी मिळते का? यासाठी कर्नाटक भाजप सरकारशी बैठक घेऊन विचारविनिमय करू. तसेच युवा नेते संजय तेली यांचे काम कौतुकास्पद असुन पुढील जिल्हा परिषद सदस्य संजय तेली असेल यासाठी मी व विलासराव जगताप मिळून पाहीजे ती ताकद देऊ असे आश्वासन पालकमंत्री खांडे यांनी दिले.
माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, माजी मंत्री जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून खोटी नाटी आश्वासन देत आहेत. प्रत्येक गावात डिजिटल फलक लाऊन म्हैसाळ योजनेचे पाणी आणल्याचा कांगावा करत फाईल नाशिक मध्ये आहे, लंडन मध्ये आहे असे सांगत लोकांची दिशाभूल करत असल्याचे सांगत तालुक्याला तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी आणण्याचे गाजर दाखवणे आणि पावसाचे पाणी आल्यानंतर प्रत्येक पाण्याचे पूजन करणारे पुजारी आमदार तालुक्याला मिळाल्याची टिका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली.
युवा नेते संजय तेली म्हणाले की, उमदी जि. प. गटाचा विकास करण्याचे ध्येय समोर ठेवून निस्वार्थी काम करीत आहे. यापुढील काळामध्ये प्रत्येक वर्षी युथ फाउंडेशनच्या वतीने पन्नास ते हजार लोकांचे सामूहिक विवाह करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच माझ्या कडे कोणतेही पद नसताना व शासकीय कोणतीही मदत न घेता रुग्णवाहिका देऊन लोकांच्या जिवावर बेतणारे अपघाताचे संकट दूर करण्याचा प्रयत्न केला आहे असल्याचे तेली यांनी सांगत उमदी जिल्हा परिषद गटातील शिक्षक भरती करत शाळा दुरुस्ती करा, सर्व तलाव भरा, उमदी येथे दोन दिवस अप्पर कार्यालय सुरू करा व सर्व रस्ते मंजूर करुन रस्ते लवकरात लवकर करा अशी मागणी संजय तेली यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खांडे यांच्या कडे केली.
यावेळी माजी जि.प.सदस्य शवरसिद्ध दुधगी, माजी पं.स.सदस्य हतमंत दुधगी, माजी सरपंच पिरसाब जमादार, माजी उपसरपंच निसार मुल्ला, चंदु नांगणे, सिद्रया तळ्ळी, रोहिदास सातपुते, संगु माळी, रवी लोणी, धोंडीराम शिंदे, राजु स्वामी, राजु चव्हाण सह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर पवार यांनी केले तर आभार सुभाष कोकळे यांनी मानले.
पालकमंत्री सुरेश भाऊ खांडे यांच्या हस्ते युवक तालुका उपाध्यक्ष पदी रवी शिवपुरे, तालुका सरचिटणीस पदी मलु सालुटगी, उमदी जिल्हा परिषद गट अध्यक्षपदी संगम ममदापुरे, सरचिटणीसपदी उत्तम कट्टमणी, उमदी शाखा अध्यक्ष पदी रोहीत शिंदे तर उपाध्यक्ष पदी राजु कोकळे यांना तसेच प्रत्येक गावांमध्ये शाखा प्रमुख व इतर पदाधिकारी यांना निवडीचे पत्र देत पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. यावेळी तालुका कमळमय करा असे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खांडे यांनी नुतन पदाधिकारी यांना केले.