राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही कार्यक्रमाचे आयोजन : किल्ल्यापासून कुमार गंधर्व रंगमंदिरपर्यंत शोभायात्रा
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, अनुसूचित जाती-जमाती कल्याण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी महषी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, अनुसूचित जाती-जमाती कल्याण अधिकारी बसवराज कुरिहुली, वाल्मिकी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तळवार, समाज कल्याण खात्याच्या उमा सालीगौडर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रामायण महाकाव्याची जगात महती
महषी वाल्मिकी कोणत्या एका समुदायासाठी मर्यादित नव्हते. रामायण महाकाव्यामुळे संपूर्ण जगाला त्यांनी रामराज्याची महती सांगितली. त्यांनी मानवीयता, शांतता, सहजीवन, अहिंसेचा मार्ग दाखविला आहे. वाल्मिकी रामायणाने अनेक आदर्श विचार मांडले आहेत, असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
यावेळी खासदार इराण्णा कडाडी म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्षे महषी वाल्मिकी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. यंदा विशेष पद्धतीने मोठय़ा उत्साहात जयंती साजरी केली जात आहे. याचवेळी आरक्षणवाढीचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. राज्य सरकारने वाल्मिकी समाजाच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रा. दोड्डनगौडा पाटील यांचे व्याख्यान झाले. बसवराज कुरिहुली यांनी स्वागत केले. सोमू माळगी यांनी सूत्रसंचालन केले. किल्ल्यापासून कुमार गंधर्व रंगमंदिरपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.
दरम्यान, बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महषी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अमोल देसाई, रामकृष्ण सांबरेकर, आप्पासाहेब नाईक, जोतिबा पाटील, शिवाजी लाड, सायमन मंतेरो, रणजित शिंदे, सदानंद पाटील, इस्माईल मुल्ला आदी उपस्थित होते.