नैसर्गिक ओढायच्या पात्रावर वाढती अतिक्रमणे ; नवीन गटारी बांधकामामुळे रस्त्यावर पाणी
संतोष माने/उचगाव
प्रशासकीय पातळीवर सर्वच ठिकाणी झालेल्या दुर्लक्षामुळे गांधीनगर तालुका करवीर येथील मुख्य रस्त्यावर सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने श्री गणेश टॉकीज जवळ पाणीच पाणी साचले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक व वाहनांना कमरे एवढ्या पाण्यातून मार्ग काढून जावे लागले.अनेक गाड्या सायलेन्सर मध्ये पाणी जाऊन बंद पडल्या तर अनेक मोटरसायकली पाण्यात बुडाल्या खरेदीसाठी बाहेरून आलेल्या ग्राहकांची तर अक्षरशः दाणादाण उडाली. चार ठिकाणच्या ग्रामपंचायतीची यंत्रणा लावून सार्वजनिक बांधकाम खात्याने ओढ्यावरील अतिक्रमण काढून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी नागरिकातून मागणी होत आहे.
अनेक वर्षांपूर्वी पासून येथील मुख्य रस्त्याच्या बाजूने नैसर्गिक ओढा वाहत होता. इतर वेळी कोरडा असणारा ओढा पावसाळ्यामध्ये हमखास दुथडी भरून वाहत असतो. विमानतळ, नेरली, तामगाव गडमुडशिंगी हद्दीतून गांधीनगर मध्ये प्रवेश करून त्यानंतर वळिवडे गावच्या हद्दीतून हा ओढा जातो. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे या ओढ्यात वेगाने पाणी आले. अचानकपणे पाण्याची पातळी वाढली आणि लोकांना मोठी कसरत करावी लागली. यामुळे गांधीनगर बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्यावर परिणाम पडला. रस्त्यावर कमरे एवढे पाणी साठल्यामुळे नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे ओढ्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.१९९० नंतर या ओढ्यावर आणि ओढ्या लगत नवीन बांधकामे झाली. काही लोकांनी ओढ्यामध्ये अतिक्रमण केली तर काही ठिकाणी ओढ्यावरच बांधकामे करण्यात आली. ही बांधकामे केल्यानंतर नैसर्गिक ओढ्याला अगदी गटारीचे स्वरूपात दोन फूट जागा सोडण्यात आली. काही ठिकाणी तर ओढ्यावर बांधकाम करून पाईपलाईन मधून पाण्याला जागा सोडण्यात आली. यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी रस्त्यावर येतेच पण सलग दोन दिवस मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी आल्याने ओढ्या वरील अतिक्रमणे काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
तहान लागल्यावर विहीर खोदण्यातला प्रकार
गांधीनगर मुख्य रस्त्यावर मंगळवारी पाणी साचले आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी महेश कांजर,नंदीवाले, गांधीनगर चे ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य यांनी बुधवारी गांधीनगर ला भेट दिली व ओढ्याची पाहणी केली.आमदार ऋतुराज पाटील यांनीही याबाबत माहिती घेतली असून गुरुवारी स्वतः ते भेट देणार आहेत.
दरम्यान काही सामाजिक संघटना संस्थानी याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती आणि संबंधित ग्रामपंचायतींना निवेदनाद्वारे कळवली होती परंतु प्रशासनाने हालचाल केलीच नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणी आली प्रशासनाने वेळीच सदस्य बांधकामे व अतिक्रमणावर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती असे बोलले जात आहे.