जिल्ह्य़ातून बोगस प्रतिज्ञापत्रे दिल्याचा मुंबई क्राईम ब्रँचला संशय : पालघर, अहमदनगर, नाशिकमध्येही तपास
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवसेना ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आल्याची तक्रार मुंबईतील निर्मलानगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कोल्हापूर जिल्हय़ातही अशी प्रतिज्ञापत्रे असल्याच्या संशयावरुन मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षक कार्यालयात शपथपत्रांची पडताळणी करण्यात आली.
शिवसेना ठाकरे गट आणि मुख्यमंत्री शिंदे गटात गेल्या तीन महिन्यापासून संघर्ष सुरु आहे. निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. यामध्ये काही प्रतिज्ञापत्रे बनावट असल्याचे समोर आले आहे. याबाबत मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे.
बुधवारी कोल्हापूरसह पालघर, अहमदनगर, नाशिकमध्ये क्राईम ब्रँचची पथके दाखल झाली. कोल्हापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्यासह एक अधिकारी आणि दोन कर्मचारी असे चार जणांचे पथक आले होते. या पथकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घेतली. कोल्हापुरातून सुध्दा खोटी शपथपत्रे पाठवल्याची शक्यता दिपक सावंत यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाला पाठिंबा देणारी शपथपत्रे सत्य की असत्य याबाबत चौकशी करण्यात येत आहे असे सांगत सावंत यांनी ही बाब न्यायालयीन असल्याने अधिक भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, खोटय़ा शपथपत्रांच्या पडताळणीसाठी क्राईम ब्रँचचे पथक कोल्हापूरात आल्याने दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती.