अपहरण नव्हे तर मुंबई ला गेले होते फिरायला पोलीस चौकशीत निष्पन्न
उचगाव / वार्ताहर
उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यातील मशिदीमधून दोन अल्पवयीन मुले मंगळवारी रात्री पळून गेल्याची तक्रार गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मात्र केवळ बारा तासातच या घटनेचा छडा लावण्यात गांधीनगर पोलिसांना यश आले आहे. फुस लावून पळवून अथवा अपहरण नसून दोघेही मुंबईला फिरण्यासाठी गेल्याचे अबूबक्कर शेख (वय १५) व झुल्फीकार शब्बीर शेख (वय १५, दोघेही रा. बालाजी पार्क मणेर मळा, उचगाव) या दोघांनी गांधीनगर पोलिसांना सांगितले. याबाबत अबूबक्करचे वडील मकबुल इस्माईल शेख (रा. बालाजी पार्क मणेर मळा, उंचगाव) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेचा छडा लवकर लागल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.
अबूबक्कर व झुल्पिकार मणेर मळ्यातील मशिद येथे गेले होते. त्यानंतर हे दोघेही रेल्वेने फिरायला मुंबई गेले होते. त्यानंतर ते बुधवारी सकाळी परत कोल्हापूरला आले. गांधीनगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे वेगाने फिरवीत मोबाईल लोकेशन वरुन एकास सीबीएसई एस.टी स्टॅन्ड वरून तसेच एकास मिरज येथून परत आणले. गांधीनगर पोलिसांनी अबूबक्कर मकबूल शेख, झुल्फीकार शब्बीर शेख या दोघांना बालकल्याण समितीच्या समोर दुपारी हजर करणार असल्याचे सपोनि सत्यराज घुले यांनी सांगितले.