प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया दिवाळीपूर्वी होणार की नाही याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. तसे बदल्यांचे आदेश किंवा वेळापत्रक ग्रामविभागाकडून प्राप्त झालेले नव्हते. पण राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 21 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली असून तब्बल 45 दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. 25 डिसेंबर रोजी बदली पात्र शिक्षकांच्या हाती बदलीचे आदेश सोपवले जाणार आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया आदेश ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेले नसल्यामुळे जिह्यात पावणेसहा हजार शिक्षकांची घालमेल सुरू झालेली होती. ही प्रक्रिया राबविताना प्रथम अवघड क्षेत्रातील शाळांची यादी संगणकीकृत करण्याचे आदेश आल्यानंतर ही प्रक्रिया खऱया अर्थाने सुरू होईल असे, जि.प.च्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांची संख्या सुमारे 10 हजाराच्या आसपास आहे. आंतर जिल्हा शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर जिल्हांतर्गत बदल्यांसाठी जिह्यातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. नुकतेच शासनाकडून जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. त्या वेळापत्रकानुसार सर्वप्रथम जिह्यातील अवघड क्षेत्रांची निश्चिती केली जाणार आहे. त्यासाठी 21 व 22 ऑक्टोबर असा दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. बदली प्रक्रियेची ही जबाबदारी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.