गोकुळ शिरगाव/वार्ताहर
तामगाव (ता. करवीर) येथील शेतात बसलेल्या बकऱ्यांच्या कळपावर जंगली स्वापदाने हल्ला केल्यामुळे पंडित धनगर (रा. नेर्ली ) यांची बकरी १४ बकरी ठार झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तामगाव येथील शंकर मारुती पाटील यांच्या शेतामध्ये काल रात्री बसवलेली असताना रात्री दहाच्या सुमारास अज्ञात जंगली स्वापदांनी हल्ला करून १४ बकरी ठार केली असून अन्य चार बकरी जखमी झाली आहेत.
या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे, वनपाल विजय पाटील, रुकेज मुलानी यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात प्राण्यांच्या पायाची ठसे घेतले असून ते तपासणीसाठी वरिष्ठांच्याकडे पाठवलेले आहेत. तसेच सांगवडे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एच. लोखंडे यांना माहिती मिळतात त्यांनी जखमी बकऱ्यांवर उपचार केले. शवविच्छेदनानंतर कोणत्या प्राण्याने हल्ला केल्याचे समजणार असल्याचे डॉक्टर व वनपाल यांनी सांगितले.
या हल्ल्यामुळे पंडित धनगर यांचे अंदाजे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले असुन हातावरील पोट असणाऱ्या मेंढपाळाचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यातून सावरण्यासाठी सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी यशवंत सेना जिल्हाध्यक्ष तम्मा शिरोळे, सरपंच प्रकाश पाटील, रायगोंडा पुजारी, सुरेश पाटील, अतुल पाटील, मंडळ अधिकारी दीपक पिंगळे, तलाठी दिपाली कुंभार, कोतवाल रवींद्र पाटील यांनी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.