आमदार सतेज पाटील यांची माहिती : महाराष्ट्रात येणारी यात्रा यशस्वी करा : जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये 3 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदवण्याचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो यात्रा’ (bharat jodo yatra) 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहे. कोल्हापुरातील (Kolhapur) काँग्रेसचे 10 हजार कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात येणारी ही यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केले. ज्यांना स्वयस्फूर्तीने या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हायचे आहे. त्यांनी 3 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीकडे आपले नाव आणि मोबाईल क्रमांकाची नोंद करावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. सात नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी येणार आहे. कोल्हापुरातील काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठय़ा संख्येने या यात्रेत सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सर्व तालुक्यातील आणि कोल्हापूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱयांसोबत शनिवारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी, प्रत्येक तालुक्यातून भारत जोडो यात्रेसाठी किती कार्यकर्ते सहभागी होणार याची तालुका अध्यक्षांकडून माहिती घेतली. महाराष्ट्रात 16 दिवस ही यात्रा चालणार आहे. दररोज 21 किमी अंतर पदयात्रा काढण्याचे नियोजन आहे.
12 तारखेला पहाटे सहा वाजता राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा हिंगोली येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी कोल्हापूरचे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिह्यातून सुमारे दहा हजार काँग्रेसचे कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होतील.
दरम्यान काँग्रेस कडून ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. त्यामुळे या पदयात्रेच्या माध्यमातून देशभरातील दुभंगलेली मने एकत्र करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत आहेत. या यात्रेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील सहभागी होतील असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या बैठकीवेळी आमदार राजूबाबा आवळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, चिटणीस सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, शशांक बावस्कर, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुंखे, जिल्हा सचिव संजय पोवार-वाईकर यांच्यासह काँग्रेसचे सर्व तालुकाप्रमुख उपस्थित होते.