खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कर्नाटक शासनाचा निषेध : सीमाचळवळीत चौथी पिढी सक्रिय
प्रतिनिधी /खानापूर
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाहीमार्गाने आतापर्यंत अनेक लढे उभे करण्यात आले. सीमाचळवळीत लढताना अनेकांनी हौतात्म्यही पत्करले. कारावासाची शिक्षा भोगली. पण सीमाप्रश्न सुटू शकला नाही. न्यायालयीन लढाई सुरू आहे. हा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही मराठी भाषिक एकत्र राहणे काळाची गरज आहे. अन्यथा येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही, असे वक्तव्य गर्लगुंजी ग्रा. पं. चे अध्यक्ष हणमंत मेलगे यांनी 1 नोव्हेंबरच्या निषेध सभेत बोलताना व्यक्त केले.
तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून समिती दुभंगली आहे. एकीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्याचाच एक भाग म्हणून गर्लगुंजीत दोन दिवसांपूर्वी एकत्र येण्याची शपथ घेतली होती. त्यादृष्टीने लक्ष्मी मंदिरमध्ये बसलेल्या एका गटाला 1 नोव्हेंबर काळय़ादिनासाठी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले. मात्र त्यातील काही मोजक्यांनीच याला प्रतिसाद दिला आहे. आता एकी झाली अशी समजून सीमाचळवळीचे काम नेत्यांनी तालुक्यात सुरू करावे, असे ते म्हणाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर पाटील होते. प्रारंभी आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक करून कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव मांडला. तसेच दोन्ही गटांच्या एकीसंदर्भात मंगळवारी लक्ष्मी मंदिर येथील दुसऱया गटाला एकत्र येण्यासाठी शिष्टाई केली. मात्र काही मोजक्यांनीच याला प्रतिसाद दिल्याने एकीत खोडा घालणाऱयांना संघटनेने बाजूला ठेवून आपले कार्य सुरू ठेवावे, असे सांगितले.
यावेळी विलास बेळगावकर म्हणाले, तालुक्यात राष्ट्रीय पक्षांनी आपले कार्य वाढवले असून मराठी युवक या राष्ट्रीय पक्षांच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे सीमाचळवळ नेटाने नेणे गरजेचे आहे. जर सीमाप्रश्न सुटला नाही तर आम्हाला काळ माफ करणार नाही.
भैरू कुंभार म्हणाले, गेल्या 66 वर्षांच्या लढय़ाला आता वेगळे वळण मिळाले आहे. मराठी भाषिकांत आजही सीमाप्रश्नाबद्दल तळमळ आहे. मात्र युवा कार्यकर्त्यांना सीमाप्रश्नाच्या चळवळीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. यासाठी समिती नेत्यांनी प्रयत्न करावेत आणि 66 वर्षांचा कर्नाटकी जुलूम थोपवण्यासाठी तरुण शक्ती असणे गरजेचे आहे. शिवसेनेचे के. पी. पाटील म्हणाले, जर एकत्र येवून सीमाप्रश्न सोडून घेतलो नाही तर आम्हाला येणारा काळ माफ करणार नाही. यावेळी पांडुरंग सावंत म्हणाले, समितीच्या एकीसाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहे.
यशवंत बिर्जे म्हणाले, 1 नोव्हेंबर आमच्यासाठी काळा दिवस आहे. गेल्या 66 वर्षांत आम्ही कर्नाटक सरकारच्या विरोधात आजही त्याच आवेशाने लढत आहोत. आमच्यात एकी राहणे काळाची गरज आहे. येत्या काळात समितीबाबत जागृती करून सीमाप्रश्न चळवळ तीव्र करुया.
यावेळी मारुती परमेकर म्हणाले, लढय़ाला 66 वर्षांचा इतिहास आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न न्यायालयात दाखल केल्याने न्यायप्रविष्ट असला तरी आम्हाला रस्त्यावरची लढाई लढलीच पाहिजे. यासाठी तालुक्यात मराठी भाषिकांनी समितीच्या भगव्या झेंडय़ाखाली एकत्र राहणे ही काळाची गरज आहे. मनातील हेवेदावे बाजूला सारावे व समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र यावे.
नारायण कापोलकर म्हणाले, 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून गेली 66 वर्षे पाळत आलो आहोत. मात्र कर्नाटक सरकारची दडपशाही आता मराठी भाषेच्या नरडीचा घोट घेण्याइतपत आलेली आहे. आज कर्नाटक सरकारने मराठी भाषा संपविण्यासाठी अंगणवाडीपासूनच कन्नड शिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे मराठी भाषेचे अस्तित्व धोकादायक वळणावर आहे. यासाठी आम्ही एकत्र येऊन लढलो नाहीतर काळ आम्हाला माफ करणार नाही. ही चळवळ टिकविण्यासाठी सीमाभाग कोटय़ातून महाराष्ट्रातून शिक्षण घेतलेल्या उच्च शिक्षितांनी सीमाप्रश्नाच्या चळवळीत आपले योगदान देणे गरजेचे आहे.
चंद्रकांत देसाई म्हणाले, 1956 पासून अन्यायाविरुद्ध आम्ही लढत आहोत. यापूर्वी आमच्या समितीकडे तालुक्याचे नेतृत्व होते. आज नेतृत्वाअभावी आमच्याकडे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी व्यक्तीप्रेमात न पडता नेते कोण आहेत, यापेक्षा समिती महत्त्वाची आहे. यासाठी सर्वांनी समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र येणे गरजेचे आहे. अर्जुन देसाई म्हणाले, 1956 साली प्रांतरचना झाली. तेव्हापासून आम्हाला न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे. पण आतापर्यंत समितीच्या जिवावर सत्ता भोगलेल्या माजी आमदारांनी संघटना द्रोह केला आहे. अशा संघटनाद्रोही माजी आमदारांचा निषेध करत असल्याचे ते म्हणाले.
सीमासत्याग्रहींची तळमळ
यावेळी सीमासत्याग्रही नारायण लाड, शंकरमामा पाटील, पुंडलिक चव्हाण हे 1 नोव्हेंबर काळय़ादिनी उपोषणात सहभागी झाले होते. सकाळी 9 पासून ते सायंकाळी 5 पर्यंत उपोषणात सहभागी झाले होते. त्यांची महाराष्ट्रात जाण्याची तळमळ आजही त्याच आवेशात आहे. आपले म्हणणे मांडताना ते म्हणाले, मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1956 पासून आम्ही सीमासत्याग्रहात सातत्याने भाग घेत आहे. शिक्षा भोगली आहे. तरीही आमच्यातील सीमाप्रश्नाबद्दलची तळमळ तसूभरही कमी झाली नाही. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही लढतच राहणार आहे. महाराष्ट्र-सरकारने या प्रश्नाकडे लक्ष देऊन सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी त्यांनी मागणी केली. तसेच खानापुरात समितीत पडलेले दोन गट लढय़ाची ताकद कमी करण्यात कारणीभूत ठरू नयेत. यासाठी व्यक्तीस्वार्थ व मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यावे, असे आवाहन केले.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना दिगंबर पाटील म्हणाले, आज तालुक्याचे नेतृत्व राष्ट्रीय पक्षाकडे असल्याने कन्नडिगांना उधाण आले आहे. आम्ही महाराष्ट्रात जाण्यासाठी जे जे करता येईल ते करत आहोत. यापुढील काळात समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी पाठपुरावा करुया.
यावेळी जि. पं. माजी सदस्य नारायण कार्वेकर, जयराम देसाई, निरंजन देसाई, डी. एम. भोसले, शिवाजी पाटील, प्रकाश चव्हाण, बी. बी. पाटील, लक्ष्मण पाटील, विठ्ठल गुरव, मऱयाप्पा पाटील, संजय पाटील, मल्हारी खांबले, भैरु कुंभार, एन. एन. पावले, ईश्वर बोबाटे, हेमंत घाडी, रामचंद्र पाटील, रमेश धबाले, संतोष पाटील, सुरेश मेलगे, संजय पाटील, सुनील पाटील, अर्जुन सिद्धाणी, प्रवीण पाटील, अनिल पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, महादेव घाडी, एन. एन. पावले, वीरुपाक्ष पाटील, अमृत पाटील, विशाल पाटील, राजू चिखलकर, मधुकर पाटील, यशवंत पाटील, डी. एम. गुरव यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
काळय़ादिनी युवकांचा सहभाग
काळय़ादिनी उपोषणात युवकांनीही आपला सहभाग दर्शवला. त्यामुळे सीमाप्रश्नाच्या चळवळीत चौथी पिढीही सक्रिय असल्याचे दिसून आले.
मोठय़ाने डीजे लावून बैठकीत व्यत्यय…
काळय़ादिनाची निषेध सभा येथील शिवस्मारकात परंपरेप्रमाणे घेण्यात येते. यावर्षी राजा छत्रपती चौकात जाणीवपूर्वक मोठय़ाने डीजे लावून बैठकीत व्यत्यय आणण्यात आला. मात्र खंबीर समिती कार्यकर्त्यांनी आपली निषेध सभा पूर्ण केली. निषेध संभा संपल्यानंतर काहीवेळातच डीजे बंद करण्यात आला.
मराठीवरील तकलादू प्रेम, राजकीय स्वार्थीपणा उघड
राष्ट्रीय पक्षात असलेल्या आणि पुढील निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मराठी भाषिक नेत्यांनी कर्नाटक राज्योत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावलेले नाहीत. हे नेते कायम वेगवेगळे बॅनर लावून मराठी भाषिकांना शुभेच्छा देण्यात आघाडीवर असतात. यावरून त्यांचे मराठीवरील तकलादू प्रेम स्पष्ट होते आणि त्यांचा राजकीय स्वार्थीपणा दिसून आलेला आहे.