विजय पाटील/असळज
गायरान जमिनीच्या हद्दीच निश्चित नाहीत तर गायरान अतिक्रमण काढायचं कशी असा प्रश्न ग्रामपंचायती सरपंच, पदाधिकारी, नागरिक यांच्याबरोबर ग्रामसेवक यांना पडला आहे.
मुंबई उच्चलयाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी तात्काळ काढण्याचे आदेश दिले आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी गावागावात जोरदार बैठक घेण्यात येत असून हद्द निश्चिती ही भूमी अभिलेख खात्याने करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. न्यायालयाचे या निर्णयाचे काही ठिकाणी स्वागत होत असले तरी ग्रामीण भागामध्ये यामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. काही नागरिकांना गायरान अतिक्रमण काढावे असे वाटत असले तरी काही भूमिहीन नागरिकांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. कारण कित्येक भूमिहीन नागरिकांना गेल्या वीस-पंचवीस वर्षा पेक्षा अधिक काळात त्यांनी त्या मध्ये घर बांधकाम केले आहे. त्यांना गावात कुठेही जागा नाही.अशा भूमिहीन बेघर नागरिकांनी काय करायचे? असा प्रश्न पडतो.
गायरान हद्दीमध्ये अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने यावर आळा घालण्याची गरज आहे. काही ठिकाणी गायरानमध्ये अतिक्रमण करताना ऊस शेती, बांबू लागवड विविध प्रकारची झाडे त्याचबरोबर गोठे बांधले आहेत. त्यामुळे गावागावात भांडण तंटे होतात. ग्रामीण भागात गायरानातील अतिक्रमणाचा विळखा वाढत आहे. काही नागरिकांनी लाखो व कोटी रुपये खर्च करून मोठमोठे बंगले बांधले आहेत. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने मात्र अशा नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. परंतु हद्द निश्चिती यावर निर्णय होणे गरजेचे आहे. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने पुढाकार घेऊन गायरान जमिनीच्या हद्दीनिश्चित कराव्यात जेणेकरून ग्रामपंचायतींना कोर्टाच्या आदेशाने गायरान अतिक्रमण काढता येईल.
गायरानमध्ये शेती असणारे अतिक्रमण काढायलाच हवे
मुंबई उच्च न्यायालयाने गायरान अतिक्रमण काढण्याचा आदेश दिल्याने गायरानमध्ये शेती करणाऱ्या नागरिकांचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. यामुळे गावातील कित्येक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यांच्याशी वाद घालावा लागतो. यामध्ये शेती करणारा अतिक्रमण धारक शेतकरी दिवसेंदिवस गायरानमध्ये अतिक्रमण वाढवत आहे. यावर आळा बसणे गरजेचे आहे.
अतिक्रमण निघाले तर भविष्यात गायरानमध्ये अतिक्रमण होणार नाही
गायरान जमिनीवरील उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही अतिक्रमण कारवाई पूर्ण झाली तर भविष्यात गायरान मध्ये अतिक्रमण करण्याचे धाडस कोणालाही होणार नाही. जर स्थगिती आली नाही तर मात्र गायरान अतिक्रमणाचा धसका नागरिकांना बसणार आहे.