पुणे / प्रतिनिधी :
पंतप्रधानपदावरील व्यक्तीकडे विकासाचा व्यापक दृष्टीकोन असायला हवा. तथापि, देशातील नेतृत्व याबाबतीत संकुचित असून, राज्याराज्यांना असमान वागणूक दिली जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जाणे, हा त्याचाच भाग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर शनिवारी निशाणा साधला. तुमच्यात परिवर्तन करण्याची क्षमता असल्याचा विश्वासही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
प्रकृती बिघडल्याने ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पवार यांनी रुग्णालयातून थेट शिर्डी गाठत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला शनिवारी हजेरी लावली. या वेळी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेते या वेळी उपस्थित होते. आपल्या छोटेखानी भाषणात पवार यांनी केंद्र सरकार, भाजपसह केंद्रीय यंत्रणांचाही समाचार घेतला.
पवार म्हणाले, 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजपने केंद्रातील सत्ता हस्तगत केली. मागच्या आठ वर्षांपासून देशावर भाजपाचे राज्य आहे. मात्र, सध्याच्या काळात देशात काय सुरू आहे, हे सर्वजण जाणतात. संसदीय लोकशाहीत केंद्र आणि राज्यात वेगवेगळय़ा पक्षांचे सरकार असू शकते. असे असले, तरी केंद्रातील सत्तेने राज्यांचा मान राखला पाहिजे. प्रधानमंत्री म्हणून शपथ घेताना सर्वांना समान वागणूक देण्याची शपथ घेतली जाते. या पदावरील व्यक्तीकडे विकासाच्यादृष्टीने व्यापक दृष्टीकोन असला पाहिजे, अशीही अपेक्षा असते. पण सध्याच्या नेतृत्त्वात या गोष्टी दिसत नाहीत.
राज्याराज्यांना असमान वागणूक दिली जात आहे. एका राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत. मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले असून, सध्याचे राज्यकर्ते किती संकुचित विचारांचे आहेत, यावरच यातून प्रकाश पडतो. संकुचित विचारांचे राज्यकर्ते आल्यावर राज्य अधोगतीला जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.