पुलाची शिरोली/वार्ताहर
भुये (ता. करवीर) येथील युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. वैभव बाबासो पाटील (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. घरातील पाणी भरण्यासाठी विद्युत पंप जोडत असताना सोमवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वैभव हा एकुलता असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांतून व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, बाबासो पाटील यांनी भुयेच्या माळावर नवीन घर बांधले आहे. दोन महिन्यापूर्वी ते नवीन घरात राहायला गेले आहेत. तेथे पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने शेतीसाठी पाणी सुरू झाल्यानंतर पाण्याच्या पाटातून दुसर्या विद्युत पंपाच्या सहाय्याने ते घरातील पाणी भरत असत. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्युत पंप जोडला होता. पण पाणी येत नसल्याचे वडील बाबासो यांनी सांगितले. त्यामुळे वैभव पाण्याच्या पाटात उतरून विद्युत पंपाचा फुटबॉल तपासत होता. अचानक विद्युत पंप पाण्यात पडला. त्यामुळे वैभवला विजेचा धक्का बसून जोरात आओरडला व तो बेशुद्ध झाला. तात्काळ त्याला कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
वैभवचे वडिल बाबासो हे ट्रॅक्टर व्यवसाय करतात. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने वैभवची आईही शेतमजूरी करते. वैभव हा एकुलता असल्याने त्यांचा आधारच गेला आहे.