जिल्हाभर होणार जनजागरण सभा : कायद्याचे महत्व, तरतुदी पटवून देण्यावर भर राहणार : अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचा पुढाकार
प्रवीण देसाई/कोल्हापूर
भ्रष्टाचाराला चाप बसणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या दिरंगाईविरोधात दाद मागता येणे, मंत्र्यांच्या गैरकारभाराविरोधात थेट तक्रार करता येणे, यासाठी प्रस्तावित असणाऱ्या जनलोकायुक्त कायदा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी आंदोलकांनी पुन्हा एकदा बाह्या सरसावल्या आहेत. यासाठी अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासने पुढाकार घेतला आहे. यामुळे रण चांगलेच तापणार आहे. जिल्हाभर गावागावात, तालुक्याच्या ठिकाणी सभा घेऊन जनजागरण केले जाणार आहे. याला काही ठिकाणी सुरुवातही झाली आहे.
केंद्रीयस्तरावर जनलोकपाल कायदा व्हावा, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन उभारले होते. त्याला यश येत 2013 मध्ये हा कायदा संसदेत मंजूर होऊन त्याची अंमलबजावणीही सुरु झाली. परंतु हा कायदा शेवटच्या स्तरापर्यंत जाण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावरही त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्या सरकारने जनलोकायुक्तची नेमणून करावी, या मागणीसाठीही आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलकांनी पाठपुरावा केला. यालाही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच राज्यांनी सकारात्मकता दर्शवून प्रक्रिया सुरु केली. परंतु महाराष्ट्रात याबाबत अद्याप कोणत्याही कार्यवाहीला सुरुवात झालेली नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलकांनी पुन्हा एकदा बाह्या सरसावल्या आहेत. अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासने राज्यभर जनजागरण सभांच्या माध्यमातून प्रबोधनाची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिह्यात यासाठी जनजागरण केले जाणार आहे. तालुकास्तरावर व गावपातळीवर जनजागरण सभांचे वेळापत्रक तयार करुन काही ठिकाणी याला सुरुवातही करण्यात आली आहे. या कायद्याचे महत्व, फायदे याबाबत सविस्तर माहिती लोकांना या सभांमधून दिली जाणार आहे.
जनलोकपाल कायदा मंजूर होऊन नऊ वर्षे झाली. परंतु त्याचा पुढील टप्पा म्हणजे जनलोकायुक्त कायद्या अद्याप महाराष्ट्रात अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी पुन्हा एकदा जनजागरण सभांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले जाणार आहे. या माध्यमातून सरकारवर दबाव आणून हा कायदा करण्यास भाग पाडले जाणार आहे. जिल्हाभर सभांचे नियोजन केले असून त्यानुसार कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. -नारायण पोवार, जिल्हाध्यक्ष, अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोध जनआंदोलन न्यास
शेवटच्या घटकालाही न्याय मागता येईल
जनलोकायुक्तची नियुक्ती झाल्यास प्रत्येक जिल्हास्तरावरही अधिकारी नेमले जातील. या जिल्हास्तरावरील अधिकार्यांच्या माध्यमातून गावपातळीवरील व तालुकास्तरावरील तक्रारी या घटनेच्या चौकटीतून जनलोकायुक्तांकडे पाठविता येणार आहेत.