डॉ. अनिता उमदी यांचे मत : जायंट्स सखी-आयएमए आयोजित व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. प्रत्येक स्त्री जागऊक व्हावी आणि समाजात त्यांच्याविषयी संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अनिता उमदी यांनी व्यक्त केले.
जायंट्स सखीतर्फे आयएमए बेळगाव शाखा आणि महिला डॉक्टर संघटनेच्या सहकार्यातून ‘महिलांचे आरोग्य आणि त्यांचे निराकरण’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. उमदी बोलत होत्या. व्यासपीठावर आयएमएच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना महाजन, महिला डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा गिजरे, आयएमएच्या राज्य उपाध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी चंद्रा चोपडे होत्या.
सकस आहार, नियमित व्यायाम, योगा आणि वैद्यकीय सल्ला खूप महत्त्वाचा आहे. महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. योग्य निदान न झाल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाच्या कर्करोगाला महिलांना तोंड द्यावे लागत आहे. धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही डॉ. उमदी म्हणाल्या.
शेवटी ‘तुमचे प्रश्न आमची उत्तरे’ या भागात उपस्थित डॉक्टरांनी महिलांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये रजोनिवृत्तीनंतर येणाऱ्या शारीरिक अडचणी, आहार कसा असावा, कोणता व्यायाम करावा, सांधेदुखी, गुडघेदुखी या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत गुलाबपुष्प आणि सदगुरू वामनराव पै यांचे पुस्तक भेट देऊन करण्यात आले. याप्रसंगी जायंट्स सखीच्या पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन करून सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी आभार मानले.